प्रा. डी. के. वैद्य
अकोले तालुका धुक्याच्या शालीत गेला लपेटून
अकोले – आज सर्व तालुक धुक्याच्या शालीने लपेटून टाकला आणि लपेटला गेलेला धुक्याच्या वातावरणातील अकोले तालुकाबाहेर यायला, तब्बल सकाळचे साडेदहा वाजले. या दरम्यान रिता नाही केला घडा । तरीही अंगणात सडा । अशीच काहीशी परिस्थिती आजच्या धुक्याने सर्व तालुकाभर निर्माण केली होती.
आज पहाटे धुक्याच्या शालीने हळूहळू तालुका कवेत घ्यायला सुरुवात केली. अंगाला झोंबणारा वारा आणि धुके वाहून नेणारा वारा असेच काहीसे चित्र हे पहाट प्रेमी फिरण्यास जाणाऱ्या लोकांना जाणवले. मात्र पहाट झोपेत असणाऱ्या अनेकांना या धुक्याच्या शालीची जाणीव सकाळी उठल्यानंतर झाली. सकाळी शंभर मीटरच्या परिसरात फक्त नजर पोहोचू शकत होती. दूरवर असणारा परिसर धुक्यात लपेटला गेला होता. झाडी, डोंगर, नद्या हे सर्व या धुक्याच्या आंघोळीने सचैल न्हाऊन निघाले आणि त्यामुळे दूरवर क्षितिजावर असणारा सूर्यनारायण केव्हा कधी बाहेर पडेल अशीच सर्वांची भावना होती.
धुक्यामुळे दिवस उगवूनही रात्रच असल्याचा भास झाल्याने आज सकाळी घरट्यातून पक्षी बाहेर पडलेच नाहीत. एरवी काव काव करणारे कावळे पहाटेलाच रस्त्यावर येऊन पोटाची खळगी भरण्यासाठी शोधमोहीम राबवणारे कावळे झाडावरच बसून, घरट्यात बसून त्यांची कावकाव सुरू होती. तर चिमण्या चिडीचूप होत्या. मैना, साळुंक्या, पोपट किंवा अन्य पक्षी, वन्य प्राणी शांतपणे या नैसर्गिक बदलाला सामोरे गेले होते. त्यामुळे दिवस कधी उजाडतो याच्या प्रतीक्षेत सर्वजण होते.
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना, बस गाड्यांना किंवा दुचाकी, चारचाकी चालकांना आपल्या गाड्यांचा हेडलाईट लावल्याशिवाय पुढचा मार्ग दिसत नव्हता. शिवाय या सर्व बदलांमुळे धुक्याचे बारीक थेंब अंगणात पडत होते. छतावर पडत होते. ते पत्र्यावर पडण्याचा किंचितसा आवाज होत होता. आणि ह्या सर्व माहोलात ‘रिता केला नाही घडा । तरीही अंगणात सडा।्। असेच चित्र प्रत्येक घराच्या पुढे सकाळी दिसून आले.
या धुक्यामुळे शाळकरी मुलांची पंचाईत झाली. एरवीच्या धामधुमीमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या अनेकांनी आपले बाहेर जाणे काही काळ पुढे ढकलले आणि या वातावरणापुढे सपशेल शरणागती पत्करली. या बदलत्या वातावरणामुळे अनेक ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, बसेस आणि अन्य वाहने संथगतीने चालत होती. त्यामुळे प्रवासी वाहतूकही काहीशी शांततेत व संथ गतीने सुरू होती.
अकोल्याचे वैभव असणारे कळसुबाईचे उंच शिखर, डोंगर, छोट्या मोठ्या टेकड्या या धुक्यामध्ये लपेटला गेल्या होत्या. “रिव्हर थेम्स’ “रिव्हर अव्हॉन’ या इंगलंडच्या शेक्सपिअर बरोबरच वर्डसवर्थ, शेले, किट्स, बायरन यांच्या लेखनाची व आपल्याकडच्या गंगा, जमुना, ब्रह्मपुत्रा यांची आठवण करून देणाऱ्या प्रवरा, मुळा, आढळा या नद्यांच्या पृष्ठभागावर तरंगणारे कापसासारखे धुके हे मनोहारी दृश्य होते. नव्हे भंडारदरा जलाशय ! निळवंडे जलाशय !! पूर्णपणे धुक्याच्या कापसाच्याखाली झाकोळले गेला होते. अशीच काहीशी भावना संजय महानोर यांनी व्यक्त केली.
झेलम चिनाबची आठवण सांगत परिसरातल्या गारठलेल्या थंडीचा अंशतः सुखद अनुभव आपल्याला घेता आला अशा प्रकारची भावना अनेकांनी यावेळेस व्यक्त केली. आणि “मन उधाण वाऱ्याचे । ऊन पावसाचे ।। अशा काव्यपंक्ती ऐकून शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी आजच्या या आल्हाददायक धुक्याच्या वातावरणाची आपल्याला सुखावून गेली अशी भावना व्यक्त केली.
या धुक्याच्या वातावरणामुळे रब्बी पिकांना मात्र मोठा फटका बसणार आहे. या बदललेल्या वातावरणामुळे गहू, हरभरा, कांदा, टोमॅटो, डाळिंब, द्राक्षे पिकांना मोठ्या प्रमाणात रोगराईला सामोरे जावे लागेल अशी भीती शेतीचे अभ्यासक प्रवीण सातपुते यांनी व्यक्त केली. पाऊस जेव्हा जातो. त्याच्यानंतर धुके पडायला सुरुवात होते. अशी ही ग्रामीण भागातली ही समजूत आहे आणि त्या समजुतीला डोळ्यासमोर ठेवून दिनकर नवले म्हणाले की, धुके पडल्यामुळे आता यापुढे पावसाची चिन्हे दिसणार नाहीत. पावसामुळे होणारी शेतकऱ्यांची धांदल ही काहीकाळ पुढे ढकलली जाईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.