नगर – नगर तालुक्यातील सांडवा येथील ढोली चिंच परिसरात 63 केव्हीचे रोहित्र मागील दीड ते दोन महिन्यापासून बंद असल्याने शेतकऱ्यांच्या फळबागा व पिक जळण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. त्यामुळे महावितरण विभागाने तातडीने लक्ष देवून, हे रोहित्र तात्काळ बदलावे अशी मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यामागणीचे निवेदन
महावितरणचे उपविभागीय अभियंता (ग्रामीण) ठाकूर व उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण) पाटील यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, प्रवीण खांदवे, मनोहर खांदवे, अमित गांधी, गौरव बोरकर, गणेश निमसे, हर्षला एडके, शहानवाज शेख, दीपक गुगळे, अविनाश काळे, बाळासाहेब केदारे, संतोष उदमले आदी उपस्थित होते.
सांडवा येथील ढोली चिंच येथे 63 केव्हीचे रोहित्र बंद पडल्याने शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे चांगला पाऊस होऊन देखील पाणी उपसा करता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या फळबागा व पिके पाण्याअभावी जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील शेतकऱ्यांनी दीड महिन्यापूर्वी महावितरण कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, अद्यापि त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर विद्युत रोहित्र दुरुस्त करावी, अशी मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सात दिवसाच्या आत सदर मागण्यांची पुर्तता न झाल्यास महावितरण कार्यालयात संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.