दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण
पिंपरी – रेशनिंग वाटपासाठी चार महिन्यांपासून बंद असलेली बायोमेट्रिक पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दररोज करोनाचे हजाराच्या आसपास रुग्ण सापडत असताना, पुन्हा बायोमेट्रिकचा पर्याय स्वीकरल्याने कार्डधारक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण असून करोनाचा धोका वाढला आहे.
करोनामुळे राज्यात मृतांची संख्या वाढत आहे. करोनाबाधितांची संख्याही राज्यात लाखाच्यावर पोहोचली आहे. करोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. मार्च महिन्यात झालेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिकांना शासकीय स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा आधार मिळाला. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीला स्थगिती देण्यात आली. या काळात अनेक कार्डधारकांच्या नावाने धान्य वितरित केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. राज्यातील काही ठिकाणच्या रेशनिंग दुकानांची अचानक तपासणी केल्याने ही बाब उघडकीस आली. याशिवाय निकृष्ट दर्जाचे अन्नदेखील कार्डधारकांच्या माथी मारले जात असल्याचे प्रकार समोर आले.
काही दुकानदारांच्या अप्रमाणिकपणाचा फटका राज्यातील सर्वच रेशनिंग दुकानदारांना बसत आहे. स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रिक पद्धत पुन्हा सुरू केली आहे. अंगठा लावल्यानंतरच धान्य मिळत आहे. परिणामी कार्डधारक आणि दुकानदारांना करोनाचा धोका निर्माण झाला आहे.
सुविधांचा अभाव
रेशन दुकानात सॅनिटायझर आणि अन्य सुविधांचा अभाव असल्याने करोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही दुकानदार मशीनवर अंगठा घेताना सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे सुविधांअभावी करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अनेक पटींनी वाढला आहे.
रेशन दुकानामध्ये दररोज येणाऱ्यांमध्ये झोपडपट्टी, चाळ संस्कृतीमधून येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. या सर्वांना बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक केल्यास करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता जास्त आहे. सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे. सरकारने लोकांच्या आयुष्याशी खेळू नये. तसेच, जोपर्यंत करोनावर अजून अधिक प्रमाणात मात करता येत नाही, तोपर्यंत बोयोमेट्रिक पडताळणीला मुदतवाढ देण्यात यावी.
– विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स असोसिएशन