एपिक इंडियाचे संशोधन : औद्योगिक, व्यवसाय क्षेत्रावरही तापमानवाढीचा परिणाम
पुणे – हवामान बदलामुळे होणाऱ्या तापमानवाढीचा परिणाम कामगारांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. कामगारांवरील उष्णतेच्या तणावामुळे भारतीय उत्पादन क्षेत्राचे नुकसान आणि राष्ट्रीय उत्पादन कमी होत असल्याचे नवीन संशोधनात असे दिसून आले आहे.
तापमानवाढीमुळे शेती उत्पादनावर परिणाम होऊन विकसनशील देशांना आर्थिक फटका बसत असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. मात्र, शेतीबरोबरच औद्योगिक अणि व्यवसाय क्षेत्रावरही तापमानवाढीचा परिणाम होत असल्याचे नुकतेच एका संशोधनात सांगण्यात आले आहे.
शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेचे दक्षिण आशियाचे (एपिक) संचालक डॉ. अनंत सुदर्शन यांनी याबाबतचे संशोधन सादर केले आहे. या संशोधनांतर्गत कामगारांच्या आऊटपुटचे अनेक हाय-फ्रीक्वेंसी मायक्रोडाटा सेट्स आणि देशभरातील 58,000 पेक्षा जास्त कारखान्यांचा राष्ट्रीय प्रतिनिधी डेटासेटचा सांख्यिकी विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे.
यासाठी डॉ. सुदर्शन यांनी हा अभ्यास दिल्ली येथील भारतीय सांख्यिकी संस्थेचे सोमनाथन, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या रोहिणी सोमनाथन आणि चॅपल हिल येथील नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या मीनू तिवारी यांच्यासमवेत केला.
या संशोधनातून संशोधकांना आढळले, की वार्षिक तापमानात दर एक डिग्री वाढ झाल्यास भारतीय औद्योगिक प्रकल्पांमधील उत्पादन क्षमता 2 टक्क्यांनी घटते आणि उष्ण वर्षात कामगार-केंद्रित प्रकल्पांमध्ये उत्पादनक्षमतेत सर्वात मोठी घट झाली आहे. भारताचा जीडीपी घटत असल्याचे दिसून आले आहे.
असा होतो परिणाम
उष्ण वातावरणात कामगारांचे गैरहजरीचे प्रमाण अधिक
कारखान्यांकडून तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिक भर
कामगारांच्या समस्येमुळे उद्योग दुसऱ्या ठिकाणी हलविण्याकडे कल; रोजगाराच्या संधी कमी झाल्याने, असमान वेतन आणि बेरोजगारी वाढण्याची शक्यता
“कामाच्या ठिकाणी वातानुकुलित यंत्रणा यासारख्या सोयी उपलब्ध केल्यास उत्पादकता काही अंशी वाढवता येईल. परंतु, कामगारांची गैरहजेरी दूर करू शकत नाही. कारण कामगार घरी व बाहेरील ठिकाणी जास्त तापमानात असतात. वातानुकुलित यंत्रणा महाग आहे, याचा वापर मर्यादित स्वरुपात केला जातो. त्यामुळे उष्ण दिवसांमध्ये कामगार अधिक प्रमाणात गैरहजर राहून, परिणामी उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. या स्थितीवर यश मिळविण्यासाठी आपल्याला उष्ण वातावरणाशी जूळवून घेण्याची गरज भासणार आहे.’
– डॉ. अनंत सुदर्शन, संचालक, एपिक, दक्षिण आशिया