लंडन – यावर्षीचा उन्हाचा मोसम खूपच तीव्र आहे. जगातील सर्वच देशांना या वाढत्या गर्मीचा त्रास होत आहे. येत्या काही वर्षांमध्ये गर्मीची तीव्रता अजूनच वाढणार असून ती मानवी सहनशक्तीच्या पलीकडे जाईल, अशी भीती व्यक्त होत असताना या वाढत्या उन्हाळ्याचा मनुष्यबळावरही विपरीत परिणाम होत असल्याची गोष्ट समोर आली आहे.
विज्ञानिक लिखाण करणाऱ्या लॅन्सेट या मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका ताजा लेखाप्रमाणे तीव्र उन्हाचा मनुष्याच्या उत्पादन क्षमतेवरही परिणाम झाला असून आगामी कालावधीमध्ये उन्हाळ्याची तीव्रता अशीच राहिली तर शेती उत्पादनामध्येही लक्षणीय घट होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
या लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे 2018 या एका वर्षांमध्ये वाढत्या उन्हामुळे तब्बल एकशे पन्नास अब्ज मनुष्य तासांचे नुकसान झाले आहे. म्हणजेच या तासामध्ये जेवढे उत्पादन शक्य होते तेवढे उत्पादन होऊ शकलेले नाही. जगभरातील देशांच्या दैनंदिन अन्नधान्याची गरज भागवणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या उत्पादन क्षमतेवरही या उन्हाचा परिणाम होणार आहे.
आगामी कालावधीमध्ये अन्नधान्याच्या उत्पादनातही लक्षणीय घट होईल अशी भीती या लेखात व्यक्त करण्यात आली आहे. उन्हाळा जेवढा जास्त तीव्र होईल तेवढ्या प्रमाणात लोकांना घराबाहेर जाऊन काम करणे शक्य होणार नाही. त्याचा परिणाम थेट उत्पादन क्षमतेवर होणार आहे. मोठ्या प्रमाणावर वनीकरणाची मोहीम राबवून जर हिरवाई निर्माण केली नाही तर 2030 पर्यंत जगातील मोठ्या लोकसंख्येला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागेल असाही इशारा या लेखात देण्यात आला आहे.