न्यूयॉर्क – करोना काळात जागतिक बाजारपेठांना फटका बसला असून भारतीय अर्थव्यवस्थाही यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यासोबतच, अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने देखील आहेत. यात प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेत वस्तूंचे, विशेषत: इंधनाचे वाढणारे भाव हे एक मोठे आव्हान आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होऊन केंद्र सरकारच्या खर्चावर मर्यादा पडण्यात होत असल्याचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
न्यूयॉर्कमध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्मला सीतारमण यांनी भारतातील इंधन दरवाढीविषयी भूमिका मांडली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी देशात सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या दरांवर चिंता व्यक्त केली आहे.
निर्मला सीतारमण म्हणाल्या, ज्या पद्धतीने देशात इंधनाचे दर वाढत आहेत, नवनवे उच्चांक गाठत आहेत, त्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर आहे. अर्थ विभागातील आमची टीम देखील याकडे अभ्यासपूर्वक पद्धतीने पाहात आहे. ही अनिश्चितता माझ्यासाठी फार मोठी चिंतेची बाब आहे, असे देखील त्यांनी नमूद केले.
दरम्यान, देशात विमानाच्या इंधनापेक्षाही वाहनांसाठी लागणारे पेट्रोल महाग झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोलपाठोपाठ डिझेलनेही कधीच शंभरी पार केली आहे. यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. करोनाकाळात आर्थिक संकटात सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस आणखीन चिंतेत सापडला आहे.