नवी दिल्ली – जगात सगळीकडे प्रचंड उलथापालथ माजली असताना ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे पंतप्रधान पद स्विकारले आहे. ते जन्माने भारतीय वंशाचे आणि हिंदू असले हृदय आणि डोक्याने पूर्णत: ब्रिटिश आहेत अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे भारतातील राजदूत ऍलेक्स एलीस यांनी एका प्रख्यात भारतीय माध्यमाच्या एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
भारत ब्रिटन संबंध, रशिया युक्रेन युध्द, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांसह विविध विषयांवरही त्यांनी यावेळी आपली मते मांडली. सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यावर भारतात विशेष उत्साहाचे वातावरण आहे. सुनक प्रख्यात उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई असल्यामुळे त्यांच्याबद्दल खास कुतुहल होते व आहे. त्यामुळे ब्रिटनचे राजदूत याकडे कसे पाहतात याविषयी लोकांमध्ये उत्सुकता होती. त्यावर ऍलेक्स एलीस म्हणाले की, ऋषी हे पंजाबी मूडचे व्यक्ती आहेत. ते भारतीय वंशाचे असले तरी ते भारतासाठी नाही ब्रिटनसाठी काम करतील.
कारण ते ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. भारत आणि ब्रिटन खूप वेगवेगळे आहेत. दोन्ही देशांमध्ये खूप फरक आहे. मात्र परस्परांच्या हिताच्या मुद्द्यांवर दोन्ही देश एकत्र काम करतील.दोन्ही देशांच्या संबंधांत बरेच चढ उतार आले आहेत. एकूणच जगात बरीच उलथापालथ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची चांगली केमिस्ट्री होती. आम्हाला आशा आहे की सुनक आणि पंतप्रधान मोदी हे संबंध आणखी चांगले पुढे नेतील.
ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यावर आता ते भारताला अनुकूल भूमिका घेतील का, यावर ऍलेक्स यांन स्पष्ट उत्तर दिले की ते ब्रिटनचे पंतप्रधान आहेत व ते त्याच देशाच्या हितासाठी काम करतात. पुढेही करत राहतील.