मेलबर्न – भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. त्याला कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 या तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी दिली पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू व समालोचक इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.
पंतने गेल्या तीन महिन्यांच्या काळात तीन कसोटींचा निकाल भारताच्या बाजूने लावण्यात मोलाची भूमिका बजावली. अनेक खेळाडूंना संपूर्ण कारकिर्दीतही अशी कामगिरी करता येत नाही, असेही चॅपेल म्हणाले.
पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या, तसेच इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत निर्णायक खेळी साकारली. त्यामुळे भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के करता आले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत पंतने केलेली खेळी फटकेबाजी कौतुकास्पद होती. त्यानंतर अहमदाबाद येथील इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत त्याने शतक झळकावून भारताच्या विजयात महत्वाची भूमीका पार पाडली.
संघ कठीण परिस्थितीत असताना त्याने ही कामगिरी केली. अनेक खेळाडूंना एकदाही संघासाठी असे योगदान देणे जमत नाही. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर पंतसारखा खेळाडू मिळणे हे भारताचे सुदैव म्हणावे लागेल, असेही चॅपेल यांनी सांगितले.
तो फलंदाजीही आक्रमक करू शकतो व त्यामुळे समोरच्या संघावर दडपण येते. त्यामुळे भारताच्या कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 अशा तिनही संघात त्याला स्थान मिळणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांतील त्याची यष्टीमागील कामगिरी पाहता पंतच्या यष्टीरक्षणातही सुधारणा झाली आहे, असेही चॅपेल म्हणाले.