नाशिक – नाशिकमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिर, रामसेतू पाण्याखाली गेली आहेत. तसेच गंगापूर धरणातून सहा हजार क्यूसेक्स वेगाने गोदापात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे. शिवाय जिल्ह्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराची ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचले आहे.
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पावसाने हजेरी लावल्याने सकाळपासून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारनंतर 6 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी गोदापात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास विसर्गात वाढ होणार आहे.