पुणे – पावसामुळे सलग दुसऱ्या आठवड्यात मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक कमी झाली. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, दुधी भोपळा, कारली, ढोबळी मिरची, तोंडली, शेवगा, मटार, दोडका, भुईमूग आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली. तर, आवक वाढल्यामुळे आले, भेंडी आणि वांगीच्या भावात घसरण झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी येथील बाजारात 70 ते 80 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, इंदौर येथून 9 टेम्पो गाजर, मध्य प्रदेश येथून लसणाची 4 ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 1600-1700 पोती, टॉमेटो दीड ते दोन हजार पेटी, भेंडी 8 ते 10 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, कोबी 3 ते 4 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, भुईमूग 100 पोती, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, पावटा 2 ते 3 टेम्पो, पुरंदर, पारनेर भागातून मटार 125 पोती, घेवडा 3 टेम्पो, तांबडा भोपळाची 7 ते 8 टेम्पो, कांदा 40 ते 45 ट्रक, आग्रा व इंदौर येथून मिळून 25 ट्रक बटाट्याची आवक झाली.