पुणे – पावसाची संततधार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून फळभाज्यांची तोडणी कमी होत आहे. यामुळे बाजारामध्ये आवक कमी होत आहे. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातही रविवारी फळभाज्यांची आवक घटली.
तर दुसरीकडे पितृपंधरवड्यामुळे काकडी, गवार, भेंडी, लाल भोपळा, घोसावळे आदी फळभाज्यांची चांगली आवक होत आहे. मात्र, त्यास अपेक्षित मागणी नसल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत या फळभाज्यांचे दर टिकून आहेत.
तर मागणी वाढल्याने कांदा, टोमॅटो, बटाटा, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे इतर फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
कोथिंबीर, मेथी, पालक पुन्हा महागली
पावसामुळे पालेभाज्यांचा पुरवठा कमी जास्त प्रमाणात होत आहे. रविवारी पालेभाज्यांची आवक चांगल्या प्रमाणात वाढली. मात्र, कोथिंबीर, मेथी आणि पालकची आवक कमी झाली. त्यातच पितृपंधरवड्यामुळे पालेभाज्यांना मागणी आहे. त्यामुळे कोथिंबीर, मेथी, पालकच्या शेकडा जुडीच्या भावात सुमारे 400 ते 500 रुपयांनी वाढ झाली. उर्वरित पालेभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. रविवारी कोथिंबीरची तब्बल दीड लाख जुडी, तर मेथीची 40 हजार जुडी इतकी आवक झाली.