नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या नेतेपदातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे केंद्र सरकार त्याम्च्या दोन्ही कारकिर्दीत सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले असून, ज्या तरुणाईच्या कल्याणाबाबत मोदी बोलतात, त्यांच्यासाठीच्या रोजगारीत कमालीची घट झाल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. बेरोजगारीच्या मुद्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य करताना कॉंग्रेसने म्हटले आहे की, मागील 45 वर्षातील बेरोजगारीचा दर सध्या सर्वात वाईट आहे. पंतप्रधानपदावर येऊन केलं मोदी? असा सवाल कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींना केला आहे.
कॉंग्रेस पक्षाने ट्विटवरून देशातील बेरोजगारीच्या आकडेवारीचा आलेख शेअर केला आहे. वर्ष 2011-12 आणि आताच्या 2020 सालातील बेरोजगारीच्या दराची तुलना कॉंग्रेसने यात केली आहे. देशात कॉंग्रेसची सत्ता असताना बेरोजगारी फक्त 2.2 टक्के होती मात्र, मोदींच्या सत्ताकाळात सप्टेंबर 2020 मध्ये देशातील बेरोजगारी दर 6.67 टक्क्यांवर गेल्याचे या आलेखावरून स्पष्ट होते. चार टक्क्यांपेक्षा जास्त बेरोजगारी देशात वाढल्याचे आलेखातून दिसत आहे. मागील 45 वर्षात देशातील बेरोजगारीची ही सर्वात भयंकर स्थिती असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
सध्या बिहार निवडणुका तोंडावर असून कॉंग्रेसने बेरोजगारीवरून मोदींना लक्ष्य केले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर देशातील अर्थव्यवस्था कमजोर झाली होती. तिला सुधारण्याचे प्रयत्न सुरू असताना देशात कोरोनाचा प्रसार झाला. टाळेबंदीमुळे देशातील उद्योग व्यवसाय आणि आर्थिक घडामोडींना खिळ बसली होती. त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. तर अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले.
आता अर्थव्यवस्थेची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. मात्र, भारताचा विकास दर हा उणे झाला आहे. त्यातच लडाखमधील चीनच्या आक्रमक धोरणामुळे दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. त्याचा व्यापारावरही परिणाम झाला आहे. अनेक चिनी कंपन्यांवर भारताने बंदी घातली असून व्यापार रोडावला आहे, असेही कॉंग्रेसने म्हटले आहे.