पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महायुतीच्या जागा वाटप तसेच निर्णयात डावलले जात असल्याचा आरोप करत महायुतीच्या प्रचार करणार नसल्याचा पवित्रा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाने जाहीर केले होते.
मात्र, आता महायुतीच्या जागा वाटपात मुंबईत धारावी आणि कालिना हे दोन मतदार संघ देण्यात आले आहेत, या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्ष महायुतीचा प्रचार करणार असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
रिपब्लिकन पक्षाला शिवसेनेच्या कोट्यातून धारावी आणि भाजपच्या कोट्यातून कलिना हे मुंबईतील दोन मतदारसंघ रिपाइंला सोडण्यात आले आहेत. महायुतीची सत्ता आल्यानंतर एक विधानपरिषद सदस्यत्व,
राज्यात एक कॅबिनेट मंत्रीपद, 4 महामंडळ अध्यक्षपदे, महामंडळ संचालकपदे, जिल्हा तालुका शासकीय कमिटी सदस्यपदे तसेच महापालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला जागा देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे, असा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे.
याबाबत राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, श्याम सदाफुले, विरेन साठे, बसवराज गायकवाड, महेंद्र कांबळे यांनी माहिती दिली आहे.