नाशिक : नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना जणीवपूर्वक दंगल घडविण्यात आली. दगडफेक करण्यात आली. दंगलीचा हा प्रकार अतिशय सुनियोजित पद्धतीने घडविण्यात आला, असा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस बीडमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना नाशिक दंगलीमधील सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये सुनियोजित पद्धतीने दंगल घडविण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यात येईल, असे पोलिसांना सांगितले होते. तसेच अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली होती. मात्र त्याचवेळी काही मंडळींनी जाणीवपूर्वक दगडफेक करत दंगा तयार केला. त्यामुळे आता कडक कारवाई करण्यात येत आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाई दरम्यान झालेल्या दंगलीत जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना बुधवारी (दि. १६) घडली होती. यात काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले होते. तसेच यामध्ये अनेक वाहनांचे नुकसानही झाले होते. दंगलीनंतर पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून सद्यः स्थितीत या भागात तणावपूर्ण शांतता आहे.
राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश
या दंगल प्रकरणात मुंबई नाका पोलीस ठाण्यात १४०० ते १५०० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष मुख्तार शेख यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये १९ एप्रिल ते ३ मेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशांनुसार हे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत शहरात आंदोलन करणे, शस्त्र घेऊन फिरणे, चित्रांच्या प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करण्यास मनाई असणार आहे. संवेदनशील भागात जमावबंदीचे आदेश जारी केले गेले आहेत.