डॉ. संजय देशमुख : बदलत्या वातावरणाचाही परिणाम
पुणे – करोना बाधितांची संख्या वाढत असली तरी ही दुसरी लाट आहे असे म्हणता येणार नाही, परंतु परिस्थिती अशीच राहिली तर फेब्रुवारी अखेर दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे मत आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
करोना साथीचा उद्रेक होणे ही सामान्य बाब आहे, परंतु सध्या बदललेले हवामान, दिवसा उष्णता, रात्री थंडी, अवकाळी पाऊस हे सगळे वातावरण विषाणू वाढीसाठी पोषक असते. त्यातून नागरिक सुरक्षेच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत, त्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
परदेशातील रुग्णवाढीची तसेच दुसऱ्या लाटेचा अभ्यास केला असता, पहिली लाट येऊन गेल्यानंतर दुसरी लाट पाच ते सहा महिन्यांनी आली आहे. आपल्याकडे पहिली लाट सप्टेंबरमध्ये ओसरून पाच महिने होत आहेत. त्यामुळे तो आलेख पाहता फेब्रुवारीअखेर दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे डॉ. देशमुख यांनी नमूद केले.
कोणत्याही साथीचा उद्रेक हा लाटेप्रमाणे असतो. करोनाची एक मोठी लाट मागच्या वर्षी येऊन गेली आहे. त्यामुळे आता करोना वाढला, तरी त्याची मोठी लाट येणार नाही. परंतु त्याच्यामध्ये चढ-उतार होत राहणार आहे. अद्याप दुसरी लाट आली नाही आणि परिस्थिती हाताबाहेरही गेली नाही. परंतु धोका मात्र अद्यापही टळला नाही. लसीकरण वेगाने झाले, तर याच्या प्रादुर्भावाची तीव्रता आणखी कमी होऊ शकेल.
– डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता ससून रुग्णालय