आंबेगावात पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला
मंचर / डिंभे – भात शेतीचं आगार अशी ओळख असलेल्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, निगडाळे, कोंढवळ, पोखरी, तळेघर, भागीतवाडी, असाणे, आहुपे आदी गावांत भात आवणीला (लावणीला) प्रारंभ झाला आहे. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली, त्यामुळे आता आदिवासी भागात शेतकरी भात आवणीत करण्यात मग्न आहे.
आंबेगाव तालुक्यात एकूण 5500 हेक्टरएवढे एकूण भातक्षेत्र आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मागील आठवड्यात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे सर्वत्र भातखाचरांत पाणी उपलब्ध झाले आहे. सध्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील सर्वत्र भात रोपे लागवडीची कामे जोमाने सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या भागातील शेतकरी प्रामुख्याने भात हेच पीक घेतात. येथील भागात इंद्रायणी, जीर, तांबडा रायभोग, खडक्या या जातीच्या भात पिकांची लावणी केली जाते.
आदिवासी भागात यंदा उशिरा पावसाला सुरुवात झाल्याने भात आवणीला उशीर झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे भातलागवड असेल त्या शेत मालकाकडून दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जाते, त्यामुळे भातलागवड वेळेत होते. मजुरांची होणारी टंचाई दूर होते.
-वामन लोहकरे, भात उत्पादक निगडाळे
इर्जिक घालून कामासाठी तयार
आजच्या आधुनिक युगातही ट्रॅक्टरशिवाय बैल जोडीच्या सहाय्याने चिखल (गाळ) करून भात लावणीची पद्धत या भागात पाहावयास मिळते. बाहेरगावी नोकरी, व्यवसाय करणारे शेतकरीही सुट्टी काढून इर्जिक पद्धतीने एकमेकांच्या शेतीच्या कामासाठी मदतीला जाण्याची पद्धत अजूनही या भागात टिकून आहे. भात रोपे लावणीकरिता सुरुवातीला चारही बाजूला बांध करून शेतात चिखल केला जातो. त्यानंतर भाताची रोपे ओळीने लावून घेतली जातात.
मजुरांचे दर वाढल्याने मोठी अडचण
यंदा काही शेतकरी अत्याधुनिक यंत्रांचा वापर करून भात लावणी करत आहे. वेळ आणि मजूर खर्चात बचत होत असल्याने पहिल्यांदाच यांत्रिक भात लागवड काही भागात सुरू आहे. सध्या मजुरांची टंचाई भासत असल्याने काही शेतकरी घरच्या घरी तर काही शेतकरी मजूर शोधून आणून भात लावणी करत आहेत.