मुंबई : महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे, या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे मंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. कल्याणकारी मंडळाच्या पहिल्या बैठकीत सरनाईक बोलत होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, २७ जानेवारी २०२५ रोजी आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या जयंती दिवशी या मंडळाची अधिकृत स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली. भविष्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या मंडळाच्या माध्यमातून लाखो चालकांसाठी राबविण्यात येतील.
राज्यभरातील सर्व रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना ५०० रुपये नोंदणी शुल्क व ३०० रुपये वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्यत्व घेता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेतस्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले असून या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने चालकांना सभासद नोंदणी करता येईल. स्वतः च्या मोबाईल वरून देखील त्यांना ते सहज शक्य होणार आहे.
तसेच ६५ वर्षावरील सभासद चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत १० हजार रुपये सन्मान निधी दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या अटी शर्ती त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे. या बरोबरच कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे.
कर्तव्यवर असताना एखादा चालकात दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे. उत्कृष्ट रिक्षा, टॅक्सी चालक, उत्कृष्ट रिक्षा, टॅक्सी चालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल, असेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले. बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.