पुणे- शहरात रिक्षांच्या भाड्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सद्यःस्थितीत शहरात पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी अठरा रुपये आणि यानंतर प्रतिकिलोमीटरला 12 रुपये 31 पैसे दर आकारला जातो. आता पहिल्या टप्प्यासाठी तीन रुपयांची वाढ होणार असून, 21 रुपये द्यावे लागणार आहेत, तर यानंतर प्रतिकिलोमीटरसाठी 14 रुपये 60 पैसे दरवाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रिक्षांच्या प्रवासी भाडेदराबाबत चर्चा झाली.
शहरात 2015 मध्ये शेवटची भाडेवाढ झाली होती. यानंतर भाडेदरात वाढ झालेली नाही. या दरम्यान करोनाचे संकट आल्याने दरवाढीचा विषय लांबणीवर पडला होता. मात्र, करोना
नियमांत शिथिलता दिल्यानंतर रिक्षा संघटनांनी भाडेदर वाढविण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चेसाठी काही दिवसांपूर्वीच आरटीओ कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती.
या बैठकीला विविध 13 रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. यामध्ये देखील बहूतांश संघटनांनी भाडेवाढ करण्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत भाडेवाढ करण्याचा निर्णय झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.