आळंदी – गेली सहा महिने झाले करोनाच्या संसर्गजन्य महामारीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे अतिशय कठीण झाले आहे. दरम्यान, चार महिने एकाच जागेवर रुतलेली रिक्षांची चाके अनलॉक प्रक्रियेनंतर 50 टक्के रस्त्यावर धावू लागली. दोन महिने थोडेफार प्रवासी घेऊन कसातरी विस्कटलेला रिक्षाचालकांचा संसार हळूहळू रुळावर येण्यास सुरुवात झाली, यामुळे अनेकांचा जीवात जीव आला कशीतरी रोजीरोटी सुरू झाली. मात्र, गुरुवारी (दि. 3) पीएमपीएमएलने पुण्यासह उपनगरात देखील बसेस सर्व मार्गावर सुरू केल्याने आळंदीतील चौकाचौकात रिक्षाचालक पुन्हा प्रवाशांच्या येण्याकडे डोळे लावून बसले आहेत.
आळंदीतील माउली मंदिरासह इतर सर्व देवदेवतांची मंदिरे बंद असल्याने नियमित येथे राज्य परिसरातून येणारे लाखो भाविक गेली सहा महिन्यांपासून दुर्लभ झाल्याने अलंकापुरी सुनीसुनी झाकी आहे. त्यामुळे येथील दळणवळणाची प्रक्रियाच सहा महिन्यांपासून थांबल्याने घरातून बाहेर पडण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व काही व्यवहार ठप्प झाले आहेत.
आळंदी येथील प्रत्येक चौका चौकात आळंदीकरांसह प्रवाशांना सेवा देणारी रिक्षा देखील प्रवाशांच्या येण्या-जाण्याकडे डोळे दिपवून वाट पाहू लागली. प्रत्येक चौका चौकात रिक्षांची जत्रा रोज भरू लागली, मात्र प्रवासी मिळेनासे झाल्याने पुन्हा त्यांच्या संसारात कुऱ्हाड कोसळल्याने आता जगावे कसे?असा प्रश्न त्यांच्यासमोर “आ’ वासून उभा राहिला आहे.
भरीव अर्थसाह्य द्या
शासनाने आम्हा रिक्षाचालकांची आर्त हाक ऐकून घ्यावी व गेली सहा महिन्यांपासून आमची झालेली वाताहात थांबून शासनाने भरीव असे अर्थसाह्य रिक्षाचालकांना मिळावे, अशी मागणी संतोष नाना डोळस यांनी रिक्षाचालकांकडे केली आहे.