रेडा -लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून इंदापूर तालुक्यातील परवानाधारक रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह ठप्प झाला आहे. रिक्षा चालकांच्या कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन मेलद्वारे पाठवले असल्याची माहिती इंदापूर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अनिल चौगुले यांनी दिली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, रिक्षाचालकांनी मदतीबाबत जिल्हाधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाकडे मदतीची मागणी केली होती; परंतु मदत मिळाली नाही. लॉकडाऊन वाढविल्यामुळे सध्या रिक्षाचालकांचे कुटुंब अडचणीत आले आहे. परवानाधारक रिक्षाचालकांना प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्यामार्फत दरमहा एक हजारांचे अर्थसाहाय्य मिळावे, पुढील 2 वर्षापर्यंत रिक्षासंबंधी आरटीओ पासिंग विमा सरकारने माफ करावा, दरवर्षी रिक्षाचालक विमा आणि पासिंग व इतर खर्चाच्या रूपाने सरकारकडे 10 ते 12 हजार रुपये जमा करतात; परंतु विम्याचा मोबदला मिळत नाही, त्यामुळे 1 वर्षाच्या विम्यामध्ये 2 वर्षांचे विमा संरक्षण मिळावे.
लॉकडाऊननंतर नियमितपणे रिक्षा सुरू होतील, त्यापूर्वी रिक्षाचालक मालकांचा सरकारने 20 लाख रुपयांचा विमा व 5 लाख रुपयांचा कॅशलेश मेडिक्लेम विमा काढावा, आदी मागण्या केल्या आहेत. रिक्षाचालक मालकांना मास्क, हॅन्डग्लोव्हज्, सॅनिटायझर सुविधा पुरवाव्यात, रिक्षाचालकांची महिन्यातून 2 वेळा मोफत आरोग्य तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते नाना सातव, इंदापूर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अनिल चौगुले, बारामती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब शिंदे, भिगवण रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय देवकाते, संघटनेचे सचिव तुकाराम गायकवाड, उपाध्यक्ष अविनाश मखरे,कार्याध्यक्ष विनोद भोसले उपस्थित होते.