मुंबई – राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. सर्वोच्च न्यायालयच्या निकषांमध्ये बसणारे आरक्षण राज्य सरकारनं आणायला हवं . अशी भूमिका मांडत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राज्यातील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.
ते पुढे म्हणाले,’राज्यातील श्रीमंत मराठा समाज गरीब मराठा समाजाला जगू देणार नाही. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठा समाजानं सर्वसामान्य गरीब मराठा समाजावर अन्याय केलाय. राज्यातील गरीब मराठा समाजाच्या विरोधात श्रीमंत मराठा समाज आहे. गरीब मराठा समाजानं आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायला हवी. श्रीमंत मराठा समाजाच्या मागे जायचं की नाही, हे ठरवायला हवं, असं आंबेडकर म्हणालेत.