दमदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
वाई – वाई तालुक्यात पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामातील कडधान्य पिकांच्या पेरणीनंतर आता वाईच्या पश्चिम भागात भात पिकाच्या लावणीला वेग आला आहे. दुबार पेरणीचे संकट टळल्याने बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण आहे. दमदार पाऊस पडल्याने भाताच्या बियाणाचे तरवे जोमात असून चांगली वाढ झाली आहे.
भाताची तरवे लावण्या योग्य झाल्याने पश्चिम भागातील बलकवडी धरण परिसरासह संपूर्ण भागात शेतकऱ्यांची भात लावणीसाठी लगबग सुरु झाली आहे. वाईचा पश्चिम भाग हा विविध जातीच्या भाताचे उत्पादन घेणारा भाग असून बासमती, इंद्रायणीसारख्या भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या वाईच्या पश्चिम भागात भात लागवडीसाठी पूरक वातावरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान असून संपूर्ण भाग शेतीची मशागत करण्यात मग्न आहे.
शेतांमधून पारंपरिक कोकणी गाणी ऐकावयास मिळत आहेत. बैलजोडींची कमतरता भासत असल्याने काही ठिकाणी यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड होताना दिसत आहे.
यांत्रिक युगात बैलांच्या सहाय्याने भात लागवड करणे मागे पडत चालले असून बळीराजा महागाई असताना देखील यंत्रांनाच पसंती देत असल्याचे चित्र या भागात दिसत आहे.
भाताच्या विविध प्रजातींमध्ये 370 बासमती, चंडीगड बासमती, पुसा बासमती, दिल्ली राईस, वरंगळ, इंद्रायणी, इंडो अमेरिका, कोलन, काळी कुसळी यांचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. पश्चिम भागासह वाई तालुक्यात तीन हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. बियाणे व खते खरेदीवर शेतकऱ्यांना जीएसटीचाही फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.