बारामती – “सरकारी अधिकाऱ्यांनी एकमेकाचा आदर ठेवून वागले पाहिजे, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण हे फारच दुःखदायक आहे. या प्रकरणात जे कोणी जबाबदार असतील यात वरिष्ठ अधिकारी असो किंवा दुसरा कोणीही असो, यात पोलिस सर्व प्रकार पुढे आणतील आणि जो कोणी यात जबाबदार असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. बारामतीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणावरून संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्री पद हे अपघाताने मिळाले आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.
“कोणाला मंत्री करावं आणि कोणाला कुठलं मंत्रीपद द्यावं हे आमचे सर्वोच्च नेते शरद पवार हेच ठरवत असतात. मात्र महाविकास आघाडीचे सरकार असणाऱ्यांनी आपल्या सहकार्यांना अडचणीत आणायचा प्रयत्न करू नये, त्र्यस्थानी केले तर ठीक आहे मात्र महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांनी असं वक्तव्य करून एकंदरीत कामकाज पाहत असताना कुठेतरी वाद वाढण्यासाठी मिठाचा खडा टाकू नये,” अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. ते बारामतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले.