चंडिगढ – निवडणुकींच्या काळात पक्षांतराच्या सत्राला उधाण येते. त्या पक्षबदलूंना त्यांच्या कृतीचे बक्षीसही उमेदवारीच्या रूपाने मिळत असते. ते चित्र पंजाबमध्ये यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ठळकपणे दिसून येत आहे.
पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीआधी अनेक आमदारांनी आणि इच्छुकांनी पक्षबदल केले. त्याचा मोठा फटका सत्तारूढ कॉंग्रेसला बसला. पक्षबदल करणाऱ्यांमध्ये कॉंग्रेसच्या नेत्यांची संख्या मोठी आहे.
त्यातील बहुतांश नेत्यांना भाजप, आप, एसएडी या पक्षांनी उमेदवारी दिली आहे. इतर पक्षांतून आलेल्या काहींना कॉंग्रेसनेही तिकीट दिले आहे. आता त्या पक्षबदलूंना मतदार अनुकूल कौल देणार की प्रतिकूल ते निकालातूनच स्पष्ट होईल. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत.
त्या राज्यात सत्तारूढ कॉंग्रेसपुढे आम आदमी पक्षाने तगडे आव्हान उभे केल्याचे मानले जाते. त्याशिवाय, एसएडी-बसप युती आणि भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीही ताकदीने निवडणूक लढवत आहे. काही शेतकरी संघटनांची आघाडी रिंगणात उतरल्याने निवडणुकीची रंगत आणखीच वाढली आहे.