राहुरी विद्यापीठ (वार्ताहर) – भारत हा कृषिप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीशिवाय सार्वत्रिक विकास शक्य नाही. उद्याच्या भविष्यासाठी शेतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. शेतीमधील नैसर्गिक उर्जास्रोताचे पुनरुजीवन करुन शेती भविष्यात हजारो वर्ष चांगल्या स्थितीत राहू शकेल. पयार्याने मानवाचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन नवीदिल्ली येथील राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आणि आत्मा, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित किसान आधार संमेलनाचे उद्घाटन डॉ.दलवाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा होते. प्रास्ताविक आणि स्वागत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. शदर गडाख यांनी केले.
दलवाई म्हणाले, आज संपूर्ण जगाला जागतिक तापमानवाढीची समस्या भेडसावत आहे. माती व जमिनीतील पाण्याची प्रत खराब झाल्यामुळे आजची शेती धोक्यात आली आहे. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेतीतील जैविक घटकांचे अवशेष पुन्हा मातीत मिसळवणे गरजेचे आहे. निसर्गाने मोफत दिलेल्या उर्जास्त्रोतांचा जास्तीत जास्त वापर करुन उर्जेची गरज भागवली पाहिजे. गेल्या चार वर्षात केंद्र सरकार शेती क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करुन कृषी विस्ताराचे धोरण आखत आहे. पीक उत्पादन घेताना उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. शिवाजीराव जगताप यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला. डॉ. रावश्यान इस्मायलो यांनी आपले मनोगत रशियन भाषेत व्यक्त केले.