नवी दिल्ली – करोनाच्या विळख्यातून सुटकेचा निश्वास सोडणाऱ्या अवघ्या जगाचं टेन्शन अमिक्रॉन विषाणूने वाढवलं आहे. अशातच करोना विषाणूच्या ‘अमिक्रॉन’ प्रकाराला भारतीय सीमांच्या बाहेरचं रोखण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. ज्या देशांमध्ये ‘अमिक्रॉन’ बाधित रुग्ण आढळून आले आहेत अशा देशांसाठी भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासाचे सुधारित नियम जाहीर केले आहेत. हे नियम आज (मंगळवार) मध्यरात्रीपासून लागू करण्यात येतील.
काय आहेत प्रवासाचे सुधारित नियम?
ज्या देशांचा समावेश भारताने ‘ऍट रिस्क’ देशांच्या यादीमध्ये केलेला आहे, त्या देशातून भारतात हवाईमार्गे प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटी पीसीआर चाचणी करण्यात येईल. या चाचणीचा निकाल येईपर्यंत या प्रवाशांना विमानतळ सोडता येणार नाही. जर करोना चाचणी निगेटिव्ह आली तर या प्रवाशांना ७ दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले जाईल. आठव्या दिवशी पुन्हा एकदा चाचणी करण्यात येईल. त्या-त्या राज्यातील अधिकारी स्वतः भेट देऊन क्वारंटाईन करण्यात आलेला व्यक्ती नियमांचे पालन करतोय ना याची शहानिशा करतील.
जर करोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर संबंधित प्रवाशावर विलगीकरणात उपचार करण्यात येईल. तसेच प्रवाशाचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी INSACOG प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील. INSACOG ही एक सरकारी प्रयोगशाळा असून सार्स कोव्ह-२ प्रकारातील विषाणूचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यासाठी त्यांची उभारणी करण्यात आली आहे.
‘ऍट रिस्क’ देशांच्या यादीत समावेश असलेल्या देशांतून येणाऱ्या नागरिकांना असं आवाहन करण्यात आलंय की त्यांनी विमानतळावर उतरल्यानंतर करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचे निकाल येईपर्यंत विमानतळावर थांबता येईल अशी तयारी करूनच यावे. ‘ऍट रिस्क’ देशांच्या यादीत आता इंग्लंड व युरोपातील सर्व ४४ देश, साऊथ आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोट्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांचा समावेश आहे.
सर्व राज्यांना बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विषाणूचा नवा अवतार अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणीतून सुटू शकत नसल्याचे आढळून आल्याने जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर जोर द्यावा असे देखील सांगण्यात आले आहे.