टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च करणार 77 कोटी
नगर – जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता वाढत असून उन्हाचा कडाखा जाणवत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूीवर दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाने नुकताच 93 कोटींचा सुधारित टंचाई आराखडा तयार केला असून आराखड्यानुसार उपाययोजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 77 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईमुळे पाणीयोजनाही बंद पडत आहेत. त्यामुळे टॅंकरच्या मागणीत वाढ होत आहे.
प्रशासनाकडून टंचाई आराखडाही तयार केला जात असून या आराखड्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबरच अन्य उपाययोजनाही सुचवण्यात येतात. परंतु, टंचाईच्या काळात नागरिकांना तत्काळ पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात भीषण दुष्काळी स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे. याआधी 67 कोटी 33 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु, दुष्काळाची तीव्रता पाहून यामध्ये 26 कोटींची वाढ करण्यात येऊन 93 कोटी 39 लाख रुपये सुधारित आराखडा तयार करण्यात आला.
या आराखड्यानुसार आता उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 77 कोटी 55 लाख रुपये निधी टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्यावर खर्च करण्यात येणार आहे. जून 2019 पर्यंत या उपाययोजना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आणखी दोन ते अडीच महिने पाणीटंचाईचे राहणार आहेत. वेळेत पाऊस पडल्यास अडचणी जाणवणार नाहीत. त्यामुळे प्रशासनास आणखी दोन ते अडीच महिने टंचाई निवारणासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाईमुळे पाणीयोजनाही बंद पडत आहेत. त्यामुळे टॅंकरला मागणी वाढत आहे. विहीर खोलीकरणासाठी 1 कोटी 57 लाख, विहीर अधिग्रहण 1 कोटी 50 लाख रुपये, टॅंकर भरणे 1 कोटी 36 लाख रुपये, नळयोजनांची दुरुस्ती 9 कोटी 91 लाख रुपये तसेच नवीन विंधन विहीर घेणे यासाठी 1 कोटी 14 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.