3 जून रोजी धरण क्षेत्राचा दौरा
धरणातील पाणीसाठा
धोम-2.26 टीएमसी
उरमोडी-1.29 टीएमसी
कण्हेर-2.29 टीएमसी
सातारा – सातारा शहरातील पाणीबाणीचे संकट ओळखून खासदार उदयनराजे भोसले यांनी कण्हेर, उरमोडी व कास धरण क्षेत्रांचा दौरा दि. 3 जून रोजी आयोजित केला आहे. कासची रेडलाईन ओलांडली गेल्यास कण्हेर व उरमोडी धरणातून सातारकरांना टंचाईच्या काळात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाटबंधारे विभागाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. खासदारकीची हॅटट्रिक नोंदवणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आढावा बैठकीत सातारा जिल्हयाच्या पाणी टंचाईचा आढावा घेतला होता. सदासर्वदा पाण्याचा सुकाळ अनुभवणाऱ्या सातारा शहरासह पाण्याची तीव टंचाई निर्माण झाली आहे.
कासची पाणीपातळी सव्वापाच फूटावर स्थिरावली असून भिंतील गतचे दोन व्हॉल्व उघडे पडले आहेत. तिसऱ्या व्हॉल्वमधून पाणी खेचले जात आहे. सातारा शहरालगतच्या उरमोडी धरणात 1.31 टीएमसी तर कण्हेर धरणात 2.29 टीएमसी पाणी साठा शिल्लक राहिला आहे. सातारा शहरात एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेऊन पाणी बचत एकीकडे होत असताना तांत्रिक त्रुटींमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मान्सूनने वीस जूनपर्यंत ओढ दिल्यास सातारा तालुक्यात पाण्याची परिस्थिती प्रचंड गंभीर होणार आहे. या पाणी-बाणीला खासदार उदयनराजे भोसले यांनी गांभीर्याने घेतले आहे. शुक्रवारी नगर व सोलापूरच्या दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या उदयनराजे 3 जून रोजी साताऱ्यात दाखल होत असून शहरासह तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उरमोडी कण्हेर कास व कृष्णा उद्भवाची पाहणी उदयनराजे स्वतः करणार आहेत.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मान्सून विलंब लक्षात घेऊन साताऱ्यासाठी आणीबाणीत पाणी वितरणाचा आराखडा बनवण्यात येणार आहे. सातारा शहरासाठी रोजचा 8 एमएलडी पाणी उपसा म्हणजे ऐंशी लाख लीटरचा आहे. मात्र पाणीबाणीमुळे या उपशावर मर्यादा आल्या असून सध्या 45 लाख लिटर पाणी तीन मोटारीने उपळीच्या (शहापूर) केंद्रातून उचलले जात आहे. साताऱ्यासाठी कण्हेर व उरमोडी धरण साठयातील किती पाणी आरक्षित करता येईल ? या मुद्यावर उदयनराजे पाटबंधारे विभागाशी चर्चा करणार आहेत.