कोलकाता : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी ही दोन्ही लोकहित विरोधी धोरणे असून ती त्वरीत मागे घेतली जावीत, आणि या बाबतीत पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप केला पाहिजे अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.हा राजकीय जय किंवा पराजयाचा विषय नाही. हा देशाच्या हिताशी संबंधीत विषय असून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीचा प्रस्ताव केंद्राने त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
आपल्या सार्वमताच्या मागणीविषयी घुमजाव करून त्यांनी आज स्पष्ट केले की या विषयावर लोकांचे मत आजमावले जावे अशी आपली मागणी होती. देशातील निष्पक्ष निरीक्षकामार्फत हे जनमत आजमावण्याचे काम केले जावे असे आपल्याला म्हणायचे होते असे त्यांनी आज स्पष्ट केले.
माझे माझ्या देशावर प्रेम आहे. माझ्या देशवासियांवरही माझा विश्वास आहे. त्यामुळे मी अन्य विदेशी संस्थांच्या निरीक्षणाखाली सार्वमत घ्यावे अशी मागणी करणार नाही. फक्त या विषयावर नेमके जनमत काय आहे ते आजमावणे महत्वाचे एवढेच आपल्याला म्हणायचे होते असे त्या म्हणाल्या.