-तलाठी कार्यालय असून अडचण, नसून खोळंबा
-कार्यालयांअभावी तलाठ्यांसह नागरिकांचीही गैरसोय
-“इंटरनेट सेवा’ही कोलमडली; नोंदीची बोंब कायम
-वीस सजांना तलाठी कार्यालयाची प्रतीक्षा
-मावळातील 20 महसुली सजा गावातील तलाठी दिसेनातनव्याने “पीकपाणी’ नोंदीच नाहीत
अडथळ्यांची शर्यत करीत तलाठी गावात येत नाहीत, अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर अनेक वर्षांपासून पीक पाणी नोंदी देखील नव्याने केलेल्या नाहीत. यामुळे अनेक खातेदारांच्या नोंदी अपडेट नाहीत. यामुळे तलाठ्यांची ज्या गावी नेमणूक करण्यात आलेली आहे, त्याच ठिकाणी तलाठ्यांनी वास्तव्य करण्याची मागणीदेखील नागरिक करीत आहेत. कार्यालये नसणारे तलाठी कुठे व कधी भेटणार याच्या वेळेची कोणत्याही प्रकारची निश्चिती नसल्याने तलाठी स्वत:च कारभार हाकत असल्याचे दिसून येत आहेत.
कामशेत – मावळ तालुक्यातील 20 महसुली सजा असणाऱ्या गावांना तलाठी कार्यालय नसल्याने या महसुली गावांतर्गत येणाऱ्या अनेक गावातील नागरिकांना तलाठ्यांच्या शोधात फिरण्याची वेळ आली आहे. तलाठ्यांना बसण्यासाठी कार्यालय नाही, आणि जिथे कार्यालय आहे, तिथे “रेंज’ नाही. नियमित रेंज असलेल्या ठिकाणी तलाठी महाशय सापडत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची परवड होत आहे. मावळ तालुक्यात महसूल विभागाची एकूण सात मंडल कार्यालये आहेत. त्या अंतर्गत 43 सजा असणारी गावे असून, या प्रत्येक सजा अंतर्गत चार ते पाच गावांचा कार्यभार एक तलाठी सांभाळतो. मावळातील 43 सजा असणाऱ्या गावांपैकी 20 सजामध्ये तलाठ्यांना बसण्यासाठी कार्यालये नाहीत. त्यामुळे या 20 महसुली सजा अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांतील नागरिकांना तलाठ्यांचा पत्ता विचारत त्यांच्यामागे फिरावे लागते आहे.
नागरिकांना सात-बारा, 8 अ चे उतारे, रहिवाशी आणि उत्पन्नाचे दाखले, जमिनीच्या नोंदी, रेशनकार्ड आणि अन्य अनेक कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी तलाठ्यांकडे जावे लागते, मात्र तलाठ्यांना बसण्यासाठी कार्यालयेच नसल्याने तलाठी एका जागेवर मिळत नाही, त्यांना मंडळ कार्यालय किंवा महसूल विभागात शोधावे लागते, ते वेळेवर मिळाले, तर ठीक नाही तर नागरिकांची कामे रखडतात. अनेक नागरिकांकडे तलाठी महाशयांचा संपर्क क्रमांक देखील आहे, मात्र अनेकदा त्यांचा मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसतो. अथवा फोनच उचलत नसल्याची तक्रारी वाढत आहेत. यामुळे वयोवृद्ध व गरीब शेतकऱ्यांची तलाठी कार्यालयातील कामेच होत नाहीत, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
तलाठी कार्यालये नसणारे काही तलाठी मंडळ कार्यालयात बसून आपल्या गावांचा कार्यभार सांभाळतात, मात्र मंडल कार्यालये गावापासून दूर असल्याने व तलाठी यांची कार्यालयातील वेळेची निश्चिती नसल्याने लोकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यात तलाठी भेटले, तरी इंटरनेटची सेवा बंद असल्याने अथवा सर्व्हर डाऊन झाल्याने 7/12 आणि 8 अ चे उतारे नागरिकांना वेळेत मिळत नाहीत. इंटरनेट कॅफेमधून ऑनलाईन पद्धतीने काढून आणलेले डिजिटल उताऱ्यांवर पुन्हा तलाठ्यांची सही शिक्का घ्यावा लागतो, यामुळे डिजीटल उताऱ्यांची सुविधा निरुपयोगी ठरत आहेत.
मावळ तालुक्यातील काही सजांसाठी
तलाठी कार्यालयांच्या निर्मितीसाठी प्रस्ताव पाठविलेले आहेत. निधी न आल्याने कार्यालये उभारलेली नाहीत. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मंडल व तलाठी यांची संख्या वाढवीत आहे. ज्या तलाठ्यांना कार्यालये नाहीत, अशा तलाठ्यांना त्यांच्या शेजारील गावातील कार्यालयात बसविले आहेत. तर काही तलाठी मंडल कार्यालयात बसत आहेत.
– रणजीत देसाई, तहसीलदार, मावळ.