मेणवली – कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाई तालुक्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. विशेषत: वाई पश्चिम भागातील धोम, बलवडीसह मेणवली भागात ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याची वेळ प्रशासनावर आली. विशेष म्हणजे पुरपरिस्थितीशी दोन हात करत महसूल विभागाने खास करुन सर्कल तलाठी बांधवांनी नदीकाठच्या पूरग्रस्तांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविले. एवढ्यावरच न थांबता पूर ओसरल्यानंतरही पूरग्रस्त गोसावी व कातकरी समाज बांधवांना सर्कल, तलाठी यांनी शासनाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत पुरग्रस्तांना मायेची उब दिली आहे.
वाई शहरासह मेणवली गावा शेजारी रहाणारी गोसावी व कातकरी वस्ती कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पूर्ण बुडून गेली होती. प्रत्येकाच्या झोपडीत पुराचे पाणी घुसल्याने घरातील सामानाची व अन्न धान्याची नासाडी झाली होती. नदीला आलेल्या पुरातून या सर्वाना महसूल प्रशासनाने सुखरूप बाहेर काढले होते. परंतु त्यांची नंतर होणारी अड़चण लक्षात घेवून मेणवली मधील पुरग्रस्त लोकांना चादर, ब्लॅंकेट, बिस्किट पुडे, महिलांना साडी, लहान मुलांना कपडे तसेच पाणी व अन्य यासह जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक पुरवठा करण्यात आला.
वाई तालुक्यात मुसळधार पावसाने कृष्णा नदीला आलेल्या महापुरात ठिकठिकाणी सापडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी कसलीही तमा न बाळगता अहोरात्र बचतकार्यात सहभागी होवून कर्त्यव्य बजावत तहसीलदार रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाई महसूलच्या सर्कल, तलाठी बांधवानी पूरग्रस्तांना मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे कोणतीही दुर्घटन घडू दिली नाही.
नदीकाठच्या लोकांना सुखरूप ठिकाणी हलवत राहण्याची, जेवणाची सोय करुन देण्यात आली. ओढ्यावरील पुलावरील पाण्यात मुसळधार पावसात उभे राहून दोन्ही बाजूला अडकलेल्या लोकांना आपुलकीचा हात देत अनेक महिला लहान मुले विद्यार्थी व ज्येष्ठांना सुखरूप घरी पोहचवून पुराच्या संकटाशी न दमता व न थकता वाई मंडलचे सर्कल राजेश झेले, तलाठी मनीषा सावळकर, राजेंद्र वंजारी, पांडुरंग भिसे, दत्तात्रय गायकवाड, गणेश अंबाटवाड, शंकर कोळेकर, जयवंत कुदळे, कमलाकर कालोखे, सोमनाथ चव्हाण यांनी अहोरात्र सामना केला.