मुंबई- आपण फेसबुकवर पोस्ट केलेली कविता ही पवार नावाच्या व्यक्तीला उद्देशून आणि त्या व्यक्तीला दुखवणारी ही पोस्ट असली तरीही कोणत्याही पवार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात तक्रार दिलेली नाही. मग पोलीस मला अटक कशी काय करु शकतात, असा प्रश्न अभिनेत्री केतकी चितळेने विचाराला आहे. पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप देखील केतकीने केला आहे.
अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारींच्या आधारे दाखल करून घेण्यात आलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत आणि माझ्यावर झालेली अटक कारवाईही बेकायदा आहे असे केतकीने म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्याविषयीची आक्षेपार्ह कविता सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल कळवा पोलीस ठाण्यासह राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यांत केतकीविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते.
फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर 14 मे रोजी कळवा पोलिसांनी केतकी विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तिला 15 जूनला अटक करण्यात आली होती. ठाणे न्यायदंडाधिकारी कोर्टाने केतकीला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर केतकी आता न्यायालयीन कोठडीत आहे.