मुंबई – केंद्र सरकारविरोधी भूमिका मांडल्याने चर्चेत असणारा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरांवर आज आयकर विभागाने छापे घातले. या कारवाईवर शंका उपस्थित करत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी अशाप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा वापर यापूर्वीही कधीही करण्यात आला नव्हता, असा प्रत्यक्ष टोला मोदी सरकारला लगावला आहे.
प्रशांत भूषण यांनी अनुराग आणि तापसीविरोधात आयकर विभागने केलेल्या कारवाईचे वृत्त शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाची ए टीम कामाला लागली आहे. आपल्या इच्छेप्रमाणे न वागणाऱ्यांना त्रास द्या, धमकवा आणि गप्प करा. भारताने अशाप्रकारे सूडबुद्धीने आयकर विभाग, सक्तवसुली संचलनालय, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेचा वापर यापूर्वी कधीही पाहिला नाही, अशा आशयाचे ट्विट भूषण यांनी केले आहे.
दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्यावरील कारवाईवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही जोरदार टीका करण्यात आली. तसेच आयकर विभागाच्या या कारवाईची चर्चा सोशल नेटवर्किंगवरही झाली. “इनकम टॅक्स’ हा ट्विटरवरील टॉप ट्रेण्ड असून अनेकांची अचानक अनुराग आणि तापसीवर झालेल्या या कारवाईसंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे.