वाफसा नसल्याने पिके पिवळे : कापुस व सोयाबीन उत्पादकांना फटका
परभणी: मागील एक आठवडयापासुन परतीचा पाऊस सुट्टी घेत नसून सतत पडणाऱ्या पावसाने जमीन वाफशावर येत नसल्याने खरिपातील पिके पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हाताशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आलाय.
परभणीत जिल्हात विजेच्या कडकडाटासह धो -धो पाऊस कोसळतोय. आठवडाभरात सहा महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालीय.
मंगळवारी कोसळलेल्या पावसाची जिल्हयातील हादगाव मंडळ व पालम या दोन महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हादगाव मंडळात ८६ मिमी तर पालम मंडळात ६६ मिमी पाऊस झाला आहे. बुधवारी पर्यंत जिल्हयातील ३९ मंडळात मिळून सरासरी १५.२५ मि.मी. पाऊस झाला आहे. १ जुन ते २५ सप्टेबर पर्यंत ५६२ मिमी पाऊस झाला असून, सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे.
दरम्यान अल्पावधीत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतामध्ये मध्ये पाणी साठवून राहत असून वाफसा होत नसल्याने काढणीस आलेले सोयाबीन पीक धोक्यात आलंय. तर कापसामध्ये झाडे ओंबळण्याचे प्रमाण वाढले असुन पाते व फुले गळीचे प्रमाणही वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. तुर पिकालाही याचा फटका बसणार असून ओंबळण्याचे प्रकार वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात सरासरीच्या 72 टक्के पाऊस पडला असला तरी जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे यासोबतच जिल्ह्यातील गोदावरीला वरील उच्च पातळीबंधारे सोडले तर सर्वच लघु व मध्यम प्रकल्प कोरडे आहेत.
रब्बी हंगामासाठी हा पाऊस पोषक
तोंडावर आलेल्या रब्बी हंगामासाठी हा पाऊस पोषक असून मागील वर्षी रब्बी हंगामा पुर्वी परतीच्या पावसाने धोका दिला होता, त्यामुळे ज्वारी, हरभरा, करडई पिक पेरण्या बऱ्याच भागात होऊ शकल्या नव्हत्या. यावर्षी मात्र रब्बीला पावसाची चांगली हजेरी असल्याने पेरणी क्षेत्र वाढणार आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. दरम्यान आणखीन काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे असून खरीप हंगामासाठी बळीराजा चिंतातुर आहे.