कोल्हापूर – सध्या इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा सुरु असून आजपासून दुसरी कसोटी अहमदाबाद येथे सुरु होत आहे. मात्र, ब्रिटीशांच्या दौऱ्याला येथील शिवदुर्ग संवर्धन समितीने विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक “जगदंबा तलवार’ इंग्लंडमध्ये आहे. ती त्यांनी आधी परत द्यावी आणि मगच भारतात क्रिकेट सामने खेळावेत. अन्यथा या सर्व सामन्यांना आम्ही गनिमी काव्याने विरोध करु, असे “शिवदुर्ग संवर्धन समिती’ने म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली “जगदंब तलवार’ सध्या इंग्लंडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात आहे. ती तलवार परत द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट आज त्यांच्या इतिहासाची साक्ष देत उभे असले तरी हे गडकोट सोडून दुसरा ऐवज आपल्याकडे नाही. जो एकमेव ऐवज तलवारीच्या रूपाने आहे, तो इंग्लडच्या राणीच्या रॉयल कलेक्शन ट्रस्ट या वस्तुसंग्रहालयात आहे. ही तलवार फसवून इंग्लडच्या राजांनी घेऊन गेल्याचा आरोप इतिहास संशोधकांचा आहे.
कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीवर चौथे छत्रपती महाराज त्यावेळी अवघ्या 11 वयाचे असताना इंग्लडचे प्रिन्स ऑफ वेल्स हे भारत भेटीवर असताना 1875-76 मध्ये ही तलवार घेऊन गेले होते. अनेकांना ही तलवार “भवानी तलवार’ आहे असेच वाटत होते. मात्र भवानी तलवार साताऱ्याच्या राजघराण्यात असून इंग्लडमध्ये “जगदंब तलवार’ घेऊन गेल्याचे इतिहास संशोधकांनी संशोधनातून स्पष्ट केले आहे. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्यासाठी वापरली गेली असून हिरे,माणिक,मोती अशी ती रत्नजडित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा सांगणारी ही तलवार परत आणावी अशी मागणी, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे.
ही तलवार परत मिळावी म्हणून गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे. लोकमान्य टिळकांपासून ते यशवंतराव चव्हाण व माजी मुख्यमंत्री ए. आर.अंतुले यांनीही काही प्रमाणात पाठपुरावा केला. सहा वर्षांपूर्वी नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही तलवार परत आणण्याची घोषणा केली. पण, अजूनही त्या दृष्टीने काहीही कार्यवाही झाली नाही. यामुळे हे आंदोलन करावे लागत आहे, असे समितीच्यावतीने हर्षल सुर्वे यांनी सांगितले.