जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान : टॅंकरद्वारे पाणी देऊन वाचवलेल्या पिकांची डोळ्यांदेखत “माती’
पुणे – जिल्ह्यात परतीच्या पावसाने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. पावसाळा संपला, आता थंडी पडणार अशी शक्यता असताना पावसाने पुनरागमन केले. काही मिनिटांसाठीच पण जोरदार पडत असलेल्या पावसाने हाताशी आलेल्या पिकांचे आतोनात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
यंदा सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाल्यामुळे अधीच मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांतील भात पिकाचे नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे पावसाअभावी पिकांसह फळझाडे जळून जाऊ नयेत, यासाठी टॅंकरने पाणी देऊन कष्टाने पिके जोपासली होती. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या या कष्टावर पाणी फेरले आहे.
मागील चार दिवसांपासून दररोज सायंकाळी जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसामुळे बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासांत भोर तालुक्यात सर्वाधिक 27 मिमी, हवेली -17, दौंड-10, आंबेगाव-6, इंदापूर-5, बारामती-2 तर पुरंदर तालुक्यात 3 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मंगळवारी (दि.5) काही गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. इंदापूर आणि बारामतीमध्ये सकाळी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते.
पुणे विभागात पावसाने झालेले नुकसान
237% ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस
57 तालुक्यांतील 2,46,721 शेतकरी बाधित
1.83 हजार हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका
44,059 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण