मल्हारपेठ (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र पोलीस आणि गावस्तरीय कमिटी आपल्या गावांत बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवून गावची सुरक्षा वाढवीत असतानाच पाटण तालुक्यातील नाडोली गावाच्या सीमेवर चक्क जवान तैनात झाले आहेत.
मुंबई, पुणे येथून नागरिकांचा लोंढा गावाकडे येत आहे. त्यामुळे गाव निगेटिव्ह असतानाही बाहेरील जिल्ह्यातील आलेल्या करोना बधितांमुळे ग्रामीण भागालाही मोठ्याप्रमाणात करोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे अनेक गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, ग्राम समिटी तसेच पोलीस यांच्या माध्यमातून गावांच्या सीमा सील करून बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी सुरू आहे.
पाटण तालुका परवापर्यंत करोना मुक्त तालुका होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे सध्या तालुक्याची करोनाची वाटचाल दोन डझनाकडे आहे. परिणामी गाव समित्या आणि प्रशासन अधिक सक्षम होत असतानाच नाडोली, ता. पाटण गावांच्या सीमा मात्र गावांत सुट्टीवर आलेल्या मिलिटरी जवानांनी ताब्यात घेतल्या असल्याचे दिसत आहे.
या गावात तब्बल पाच मिलिटरी जवान काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आले आहेत. आपले गाव जरी सध्या निगेटिव्ह असलेतरी गावात मुंबईहून आलेली व्यक्तींचा नुकताच मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कातील काहींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. शिवाय गाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ सुरू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या गावात सुट्टीवर आलेल्या फौजींनीच आपल्या गावासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे एरव्ही हातात बंदूक घेऊन देशाच्या सीमेवर पहारा देऊन देशाचे रक्षण करणारे हे जवान आपल्याच गावाच्या सीमेवर हातात काठी घेऊन आणि तोंडाला मास्क बांधून गावाची सुरक्षा करताना दिसत आहेत. त्यामुळे नाडोली गावातील मिलिटरी जवानांच्या या अनोख्या देशसेवेचे सर्वत्र कौतुक होत असून राज्यात सुट्टीवर असलेल्या तसेच आजी-माजी जवानांनी प्रशासनाला मदत करण्यची गरज आहे.