पुणे – एकीकडे किरकोळ खरेदीदारांनी भाजीपाला, फळे खरेदीसाठी मार्केट यार्डात येऊ नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासन कडून करण्यात येत आहे.तर, दुसरीकडे किरकोळ विक्रेत्यांनी प्रवेशद्वार तीन ते चार दरम्यान बाजार मांडला आहे. येथे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. सोशल डिटन्स पाळला जात नाही. विशेष म्हणजे बाजार समिती प्रशासनानेही याकडे दूर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
गेट नंबर ३ ते गेट नंबर ४चा रस्ता हा भुसार विभागात येतो. या ठिकाणी भाजीपाला, फळे विकण्यास परवानगी नाही. तसेच भाजीपाला, फळे विभागात किरकोळ विक्रेत्यांना आणि ग्राहकांना बाजारात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याचाच फायदा घेत भुसार बाजारातच किरकोळ विक्रेत्यांनी समितीच्या आदेशाला हरताळ फासले आहे. त्यामुळे या परिसरात भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत बाजार समितीचे ४०० कर्मचारी आणि १२० ते १३० पोलिसांच्या फौजफाट्यात मार्केट यार्ड नियमित सुरू आहे. तरीही या ठिकाणी गर्दी होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेऊन ‘सोशल डिस्टन्सिंग’ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या प्रमाणे बाजार समितीकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही किरकोळ विक्रेत्यांकडून याला हरताळ फासला जात आहे. याच रस्त्यालगत झोपडपट्टी आहे.
बाजारात भाजीपाला खरेदीसाठी अनेकजण एकाच घरातील दोघे-तिघे जण येत आहेत. त्यामुळे अनेकांना अजूनही कोरोना आजाराबाबत गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. याविषयी विचारणा करण्यासाठी बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयन्त करण्यात आला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.