23 लाख टन साखरेची निर्यात
पुणे – आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर अचानक कमी झाल्याने त्याचा परिणाम साखर उद्योगावर झाला आहे. निर्यातीचा कोटा वाढवून सुद्धा आत्तापर्यंत फक्त 23 लाख टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे तर आणखी 7 लाख टनाच्या निर्यातीचे व्यवहार झाले आहेत.
यंदा राज्यात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे कारखान्यांमध्ये साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात पडून आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी सुद्धा साखरेचे उत्पादन जास्त झाल्याने त्यातील साखर काही प्रमाणात शिल्लक आहे. अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त साखर निर्यात करुन तोटा भरून काढण्याचा निर्णय कारखान्यांनी घेतला होता; पण त्यात कारखान्याच्या हाती फारसे काही लागलेले दिसत नाही. केंद्र सरकारने दरवर्षी पेक्षा यंदा निर्यातीचा कोटा वाढवून तो 50 लाख टनापर्यंत केला होता. त्यामुळे साखर कारखान्यांमध्ये आशा निर्माण झाली होती; पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरल्याने निर्यात करून साखर फायदा होत नसल्याचे कारखान्यांच्या लक्षात आले आहे.
केंद्र सरकारने पन्नास लाख टनाचा कोटा राज्यनिहाय कारखान्यांना विभागून देण्यात आला होता. त्यापैकी महाराष्ट्रात 15 लाख 58 हजार टन इतक्या कोट्यापैकी 10 लाख टन साखरेची निर्यात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.