नवी दिल्ली – इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या फेरपरीक्षांचे निकाल 10 ऑक्टोबरला किंवा त्यापूर्वीच जाहीर केले जातील, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ‘सीबीएसई’ने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
याशिवाय पदवीपूर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक 31 ऑक्टोबरपासून सुरू होईल. तोपर्यंत या अभ्यासक्रमांसाठी पात्र असलेल्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे निकालही लागलेले असतील, असे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात ‘यूजीसी’नेही सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
इयत्ता 12 वीच्या फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी ‘सीबीएसई’ आणि ‘यूजीसी’ने योग्यप्रकारे नियोजन करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी दिली होती.
करोनाच्या साथीमुळे उद्भवलेली स्थिती असामान्य असल्याने यंत्रणांनी विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने वेगाने काम पूर्ण करावे, असेही न्यायालयाने सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही यंत्रणांनी ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.