लॉकडाऊन उठल्यावर काम सुरु करण्याचा एजन्सीचा पवित्रा
पुणे(प्रतिनिधी) – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून लॉकडाऊनही वाढविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालाचे कामकाज ठप्प पडले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतरच निकालाचे कामकाज पूर्ण करण्याचा पवित्रा संबंधित बड्या एजन्सीने घेतलेला आहे. यामुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल आणखी लांबणीवर पडणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 19 जानेवारीला टीईटी तर 16 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. टीईटीच्या परीक्षेसाठी 3 लाख 43 हजार 283 उमेदवारांनी नोंदणी केली होती. या परीक्षेची अंतरिम व अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आलेली आहे. दरम्यान सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) व खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) उत्तीर्ण होण्यासाठी 5 टक्के सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यासाठी आत्तापर्यंत 7 हजार 400 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. यातील 6 हजार 700 अर्ज पात्र तर 700 अर्ज अपात्र ठरविण्यात आलेले आहेत. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी आणखी मुदत वाढ देण्यात आलेली आहेत. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करुन अंतिम निकाल जाहीर करण्याचे काम अद्याप बाकी आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 9 लाख 71 हजार 764 विद्यार्थ्यांची नोंदणी शाळांनी केली होती. यात इयत्ता पाचवीसाठी 5 लाख 74 हजार 372 तर आठवी साठी 3 लाख 97 हजार 392 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेची अंतरिम उत्तरसूची ही प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर प्रश्नपत्रिका मधील चुका व उत्तरसूची यावर ऑनलाईन आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या आक्षेपांची विषय तज्ञांमार्फत तपासणी करण्यासह इतर कामे रखडली आहेत. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या विषय तज्ञांकडून आक्षेपांची तपासणी करावी लागते. हे तज्ञ विविध जिल्ह्यातील आहेत. आक्षेपांची तपासणी व उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंगचे काम ठप्प पडले आहे. अंतिम उत्तरसूचीही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे या परीक्षेचा निकाल आता जून ऐवजी ऑगस्टमध्ये लागण्याची शक्यता अधिक आहे.
या दोन्ही परीक्षा व निकालाचे कामकाज एकाच एजन्सीकडे आहे. परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी एजन्सीला तात्काळ परीक्षांच्या निकालाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या एजन्सीने लॉकडाऊनच्या कालावधीत निकालाचे कामकाज करता येणार नाही असे स्पष्ट कळविले आहे. एजन्सीचे कर्मचारी हे पुण्याबाहेरील आहेत. ते मार्चमध्येच आपआपल्या गावी निघून गेलेले आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतरच ते परत येणार आहेत. त्यानंतरच निकालाच्या कामकाजाचा सुरुवात होणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.