पुढच्या आठवड्यात लोकसभा निवडणुकींचे निकाल आहेत. निकालाचा दिवस म्हटले की, नाही म्हटले तरी टेन्शन येतेच. निकाल, मग तो कसलाही असो. केजीपासून ते पीजीपर्यंत परीक्षांचा वा आणखी कसला. निकाल आणि टेन्शन यांचे समीकरण सुटत नाही. आणि जर हे निकाल अधिकच महत्त्वाचे असतील, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या परीक्षांचे वा नेत्यासांठी निवडणुकीचे तर मग कमालीचे टेन्शन येते. निकालाची अगदी खात्री असली, तरीही प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत जीव धाकधूक करत असतो. काळजाचे ठोके वाढलेले असतात.
निकाल म्हटले, की विद्यार्थ्याला धाकधूक असते. या तणावाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तुमच्या मनातली निकालाची भीती पळवून लावण्यासाठी या काही टिप्स…
दीर्घ श्वास घ्या
– डोळे मिटून संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. शरीर आणि मन शांत करा. दररोज पाच ते दहा मिनिटं वेळ काढून मेडिटेशन केल्यास फायदा होतो.
– निकालाची खात्री नसली, मन नाराज असले, तरीही वेळच्यावेळी खायला हवंच. उपाशी राहून काहीच बदलणार नाही. किंबहुना बिघडण्याचीच शक्यता जास्त आहे. मधल्या वेळेत दूध, ताजी फळं, उपमा, पोहे, खाकरा, सॅंडविच यांसारखे पौष्टिक पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या. स्वयंपाकाला नावीन्याची जोड द्या.
भरपूर पाणी प्या
– दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि शरीरातील अंतर्गत क्रिया व्यवस्थित पार पडतात.
– एक गोष्ट लक्षात ठेवा. फिटनेसला पर्याय नाही. मग तो फिटनेस शारीरिक असो वा मानसिक असो.
– दिवसातली तीस मिनिटं व्यायामासाठी राखून ठेवा. व्यायामामुळे ताण हलका होतो आणि उत्साह संचारतो.
टेन्शनला पळवून लावा
– जर जास्तच ताण जाणवायला लागला, तर आवडीचं काही तरी करण्यात स्वतःला गुंतवून ठेवा. उदा. गाणी ऐकणं किंवा भटकंती.
– अशा वेळी शांत झोप अधिकच गरजेची असते.
– रोज किमान सहा ते आठ तासाची शांत झोप घेणं गरजेचं आहे. झोपण्याआधी दहा मिनिटं पायाचे तळवे गरम पाण्यात बुडवल्यानं झोप चांगली लागते.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
– नखं खाणं, उगाचच विचार करत बसणं, नुसतीच पानं उलटत पुस्तकाकडे बघत बसणं अशा सवयींपासून लांब राहा. यामुळे वेळ तर फुकट जातोच, शिवाय अवघड प्रश्नांना आमंत्रण मिळतं. स्वतःचं आयुष्य सोपं करणं हे आपल्या हातात असतं आणि विचारांमध्ये सुसूत्रता आणून आपण ते करूच शकतो.
मेंदूला हवं खाद्य
– सुकामेवा हा प्रथिनं आणि जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहे. काजू, बदाम, मनुका, अक्रोड, अंजीर खाल्ल्यानं शरीराला आवश्यक पोषणतत्त्व मिळतात. फक्त प्रमाणावर लक्ष असू द्या, कारण वजन वाढण्याची शक्यता असते.
– काहीही असले, तरी निकालाच दिवस हा देखील वर्षातील इतर 364 दिवसांसारखा एक दिवस आहे हे पक्के ध्यानात ठेवा,
– अनुराधा पवार