देशातील उत्पादकांना योग्य भाव मिळण्यासाठी निर्णय
पुणे – श्रीलंका आणि इतर काही देशांतून स्वस्त खोबऱ्याची मोठ्या प्रमाणात आयात होत असल्यामुळे देशातील नारळ उत्पादकांना भाव कमी मिळत आहे. त्यासाठी खोबऱ्याच्या काही उत्पादनाच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
परकीय व्यापार महासंचालनालयाकडे देशातील नारळ उत्पादकांनी अनेकवेळा तक्रारी केल्यानंतर सर्व परिस्थितीचा विचार करून महासंचालनालयाने खोबऱ्याच्या पावडरची (डेसिकेटेड कोकोनट) आयात 150 रुपये प्रति किलो दरापेक्षा कमी दराने करता येणार नसल्याचे सांगितले आहे. या पावडरचा वापर मोठ्या अन्न उद्योगांमध्ये व इतर ठिकाणी कण्यात येते.
जर खोबऱ्याच्या पावडरची किंमत 150 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर, त्यावर आयात शुल्क लागणार नाही. मात्र, त्यापेक्षा कमी दराने केलेल्या आयातीवर बंदी घातली आहे. 2018-19 मध्ये भारतातून अशा पावडरची 7.45 दशलक्ष डॉलरची आयात झाली होती. मात्र, यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळातच अशा पावडरची तब्बल 21.43 दशलक्ष डॉलरची आयात झाली आहे. या सर्व घडामोडींचा विचार करून महासंचालनालयाने खोबऱ्याच्या पावडरवर निर्बंध घालण्याचा हा निर्णय घेतला आहे.
महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीलंकेमधून गेल्यावर्षी 314 टन पावडरची आयात झाली होती. मात्र, या वर्षी हे प्रमाण 5 हजार 340 टनांवर गेले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे नारळ उत्पादकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे.