श्रीनगर – केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा पुन्हा बहाल करावा, या मागणीचा पुनरूच्चार शनिवारी राजकीय पक्षांच्या आघाडीने केला. त्यासंदर्भात आघाडीने विश्वासघात या नावाने एक श्वेतपत्रिका जारी केली.
केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये विशेष दर्जा काढून घेऊन जम्मू-काश्मीरचे विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशांत केले. त्या निर्णयाला विरोध दर्शवत जम्मू-काश्मीरमधील पाच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली. विशेष दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी लढा देण्याच्या उद्देशातून ती आघाडी उभी राहिली. त्या आघाडीने येथे झालेल्या बैठकीनंतर श्वेतपत्रिका जारी केली.
केंद्र सरकारने आपल्या निर्णयाचे तटस्थपणे मूल्यमापन करावे. तो निर्णय म्हणजे दु:साहस, घटनेचा भंग आणि जनतेचा विश्वासघात असल्याची जाणीव सरकारला होईल, असे त्या श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले. सरकारच्या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे. जम्मू-काश्मीर आणि देशातील जनतेमधील दरी वाढली आहे, असे त्या राजकीय पक्षांच्या आघाडीचे म्हणणे आहे.