पाऊस लांबल्याने शेतकरी दुहेरी संकटात
आमदार शिवाजी कर्डिले यांना निवेदनअधिकाऱ्यांचे फोन नॉट रिचेबल
जिल्हा प्रशासनाच्या वतीने चारा छावण्या 1 ऑगस्ट पर्यंत सुरु राहाव्यात असा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला होता. शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय चारा छावण्या बंद करू नये असेही सांगण्यात आले होते. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या मनमाणीकारभारामुळे जिल्ह्यातील अनेक चारा छावण्या बंद करण्यात आल्या. त्यातील काही चारा छावण्या पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार कर्डिले यांच्याकडे केली. याबाबत आ. कर्डिले यांनी संबंधित अधिकारी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र, नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन नॉट रिचेबल लागला. नंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर चारा छावण्या सुरु करण्याचे आश्वासन दिले.
नगर – जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने, पशुधन वाचविण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात 504 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या छावण्या मध्ये 3 लाख 32 हजार जनावरे होती. गेल्या दहा-बारा दिवसापूर्वी वरुणराजाची कृपा दृष्टी झाल्याने जिल्ह्यातील अनेक चारा छावण्या बंद झाल्या होत्या. मात्र, पुन्हा पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात चारा टंचाईचा सामना पशुपालकांना करावा लागत असून बंद केलेल्या चारा छावण्या पुन्हा प्रशासनाने सुरु कराव्यात अशी मागणी अनेक गावातील शेतकऱ्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कडे केली आहे.
जिल्ह्यामध्ये मागील वर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागला. प्रशासनाकडून ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी तब्बल 860 टॅंकर सुरू करण्यात आले. तर पशुधन वाचविण्यासाठी 504 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता त्यापैकी अनेक चारा छावण्या बंद पडल्या आहेत. तर काही तालुक्यातुन चारा छावण्या पुन्हा सुरु कराव्यात अशी ही मागणी होवू लागली आहे.
गेल्या आठवड्यापूर्वी पाऊस झाल्याने अनेक चारा छावणीमध्ये चिखल झाला होतो. तर जनावरांसाठी केलेला निवारा वादळाने उडाला होतो. परंतु आता नविन जागेत पुन्हा चारा छावण्या सुरु प्रशासनाने करावी अशी ही मागणी होवू लागली आहे. जिल्हाभरात आजमितीस 184 चारा छावण्या सुरु असून, या छावण्यांत तब्बल 1 लाख 10 हजार 472 जनावरे आहेत. यामध्ये लहान जनावरे 12 हजार 496 असून, मोठे जनावरे 97 हजार 976 जनावरे अद्याप चारा छावण्यात आहेत.
यंदाही सरासरीपेक्षा गेल्या दिड महिण्यापासून कमी पाऊस झाल्याने, पुन्हा जिल्हा दुष्काळात होरपळेल का असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे. पावसाअभावी खरीप हंगाम हाती लागेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढू होवू लागली आहे. जनावरांना चारा आणि पाणी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेऊन पशुपालकांना दिलासा द्यावा अशी ही मागणी होत आहे.