आढावा बैठकीत फलटण तहसीलदारांचे निर्देश
कोळकी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे स्वागत व तालुक्यातील 3 मुक्कामाच्या ठिकाणांसह तालुक्यातील वास्तव्या दरम्यान नियोजन, तालुक्यातील चारा, पाणी टंचाई आढावा व नियोजन आणि तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन नियोजन तसेच 33 कोटी वृक्ष लागवड योजना आढावा आदी बैठका तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पार पडल्या.
या बैठकांना नगरपरिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. पोटे, नीरा उजवा कालवा फलटण उपविभागाचे उपविभागीय अभियंता योगेश सावंत, महावितरणचे साहाय्यक अभियंता साळी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता गरुड, शहर अभियंता साठे, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, ग्रामीण पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता पाटणे, निवासी नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, नायब तहसीलदार ठोंबरे उपस्थित होते.
पालखी सोहळा नियोजन बैठकीत पाणी पुरवठा, तात्पुरती स्वच्छतागृहे, पालखी मार्गाची दुरुस्ती, पालखी तळांची स्वच्छता व अन्य व्यवस्था, सोहळ्याच्या तालुक्यातील वास्तव्या दरम्यान आरोग्य विषयक बाबींची पूर्तता, पाण्याचे नमुने तपासणी, एसटीची वाहतूक व्यवस्था व तात्पुरते बसस्थानक उभारणी आणि पोलीस संरक्षण आदी बाबींचे नियोजन व त्याचा आढावा घेण्यात आला. 20 मे पूर्वी सर्व विभागांनी आपल्या विभागाची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
मान्सूनपूर्व तयारीबाबत संबंधित विभागांनी केलेले नियोजन समजावून घेवून त्याबाबत त्यांना काही सूचना करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. नीरा नदीकाठच्या गावांमध्ये असलेले पट्टीचे पोहणारे, जेसीबीधारक, ट्रॅक्टर धारक यांची नावे व संपर्क क्रमांक संकलीत करुन याद्या करणे, नदी काठच्या गावातील ग्रामपंचायतींचे ध्वनीवर्धक व सूचना दर्शक भोंगे सुरू असल्याची खातरजमा करून ते सुस्थितीत ठेवावेत, नीरा नदीला आलेल्या पुराचा फुगवटा येणारे ओढे किंवा पूर येणारे ओढे यांच्याबाबतीत विशेष दक्षता घेऊन तेथे संरक्षणाच्या दृष्टीने माहिती देणारे फलक लावावेत अशा सूचना संबंधित यंत्रणांना करण्यात आल्या.
33 कोटी वृक्षलागवड योजनेचा आढावा घेऊन पावसाळ्यापूर्वी नेमून दिलेल्या इस्टांकाप्रमाणे वृक्षारोपणासाठी खड्डे घ्यावेत, आवश्यक रोपांची मागणी वनखात्याकडे नोंदवावी आदी सूचना देण्यात आल्या. सद्यःस्थितीत सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या चारा, पाणी, टंचाईबाबत आढावा घेण्यात आला, चारा छावण्या सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. टॅंकर सुरू असलेल्या गावांप्रमाणेच त्याशिवाय मागणी असलेल्या गावांची पाहणी करुन तेथेही पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले.
नगरपरिषद हद्दीतील सर्व गटारे साफ करून घेणेबाबत तसेच नाले तुंबणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या. तसेच अतिवृष्टीने नुकसान झाल्यावर कोणत्याही आदेशाची वाट न पाहता ग्रामसेवक, तलाठी, कृषी साहाय्यक यांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावेत अशा सूचना देण्यात आल्या. तहसील कार्यालयाप्रमाणे अन्य कार्यालयातही आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून ते 24 तास सुरू राहणार आहेत.
तेथील संपर्कासाठी सर्व विभागांनी या आपत्ती निवारण कक्षात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक 20 मे पूर्वी तहसील कार्यालयात सादर करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा नियोजन, आपत्ती निवारण, मान्सून पूर्व तयारीचे नियोजन, 33 कोटी वृक्ष लागवड योजना, चारा, पाणी टंचाई व छावण्या सुरू करणे याबाबत संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या असल्याने प्रत्येक विभागाने आपले काम जबाबदारीने करुन कोणालाही कसलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन तहसीलदार हनुमंत पाटील यांनी शेवटी केले.