नगर – केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी बुधवारी,दि.8 पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणीक संपाला नगरमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. विविध कामगार संघटनांनी या संपात सहभाग घेतल्याने शासकीय-निमशासकीय कार्यालयांचे,बॅंकांचे कामकाज ठप्प झाले होते. तर कामगार संघटनांच्या मोर्चांनी व निर्दशने आणि घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
विविध समन्वय संघटनांच्या समन्वय समितीचा मोर्चा केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, कामगार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रातील, महानगरपालिका कर्मचारी, हमाल-माथाडी तसेच देशपातळीवरील सर्व क्षेत्रातील कर्मचारी विरोधी निर्णय सातत्याने घेत असून, त्याचे न्याय व रास्त अधिकार हिरावून घेत आहेत. या अन्यायाच्या विरोधात आज आज विविध संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने देशव्यापी संपाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आलेल्या मोर्चात हमाल पंचायत संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, कर्मचारी संघटनेचे रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, शिक्षक संघटनेचे अप्पासाहेब शिंदे, मनपाचे अनंत लोखंडे, ऍड.सुभाष लांडे, बाबा आरगडे, शंकर न्यालपेल्ली आदिंसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी बोलतांना अविनाश घुले म्हणाले, गेल्या 5 वर्षात भाजपाच्या शासनाने सातत्याने कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या विरोधात धोरणे घेऊन त्यांच्या हितावर घात घालण्याचे काम केले आहे. कायदा दुरुस्तीच्या नावाखाली अन्यायकारक विविध बंधने लादण्यात आली आहेत. रेशन, पेन्शन, बाजार समिती बरखास्ती सारखे निर्णय घेऊन एकंदरीतच हक्क हिरावून घेण्याचे काम शासनाच्यावतीने सुरु आहे.
तरी सध्याच्या शासनाने त्वरित निर्णय घेऊन कष्टकऱ्याना न्याय मिळवून द्यावा तसेच शासनाने तात्काळ जाचक अटी नियम घालून बदल केलेला माथाडी कायदा जैसे थे ठेवून रेशन व पेन्शन लागू करून घरकुले देऊन कामगारांचे हित जपावे, अशी मागणी यावेळी श्री. घुले यांनी यावेळी केली.
यावेळी अनंत लोखंडे म्हणाले, राज्यात सुमारे 2 लाख सरकारी पदे रिक्त असून, या पदांचा अतिरिक्त कारभार कार्यरत कर्मचाऱ्यांना सांभाळावा लागत आहे.
याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम कर्मचाऱ्यांना भोगावे लागत आहे. याकरीता सर्व विभागातील पदे तातडीने भरावीत, अनुकंपानुसार नियुक्तीसाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊन त्यांना शासकीय सेवेत त्वरित नियुक्त्या द्याव्यात, जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी गोविंद सांगळे, शेख रज्जाक, मधुकर केकाण, बाळासाहेब वडागळे, लक्ष्मीबाई कानडे, भैरु कोतकर, विष्णू म्हस्के आदींची भाषणे झाली.
ग्रामसेवक युनियनची नगर जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक व सामाजिक धोरणाविरोधात देशभरातील कामगार व कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या रोजी देशव्यापी संपात राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांनी सहभाग घेतला.
नगरमध्येही जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी एकत्र येत जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगारी, कामगार कायद्यातील चुकीचे बदल, कंत्राटीकरणाचा अतिरेक आदींबाबत सर्वसामान्य जनतेत तीव्र नाराजी आहे. याशिवाय सरकारी कर्मचारीही अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतानाही त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. याविरोधात आवाज उठवण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी यावेळी सांगितले.
राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्त्वाखालील या आंदोलनात अशोक नरसाळे, सुनिल नागरे, सुरेश मंडलिक, गंगाधर राऊत, मंगेश पुंड, बाळासाहेब आंबरे, राजेंद्र पावसे, दिलीप नागरगोजे, रवींद्र ताजणे, श्रीकांत साळे, सुनिल वाघ, मच्छिंद्र सांगळे, धनाजी फडतरे, अशोक बलदाणे, शांताराम कावरे आदी सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांची भेट घेवून निवेदन दिले.