वाई – वाई शहरातील जनता कर्फ्यू यशस्वी होत असून या काळात जीवनावश्यक वस्तूंसाठी केलल्या नियोजनालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. या कर्फ्यूमधून किराणा, औषधे या जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वगळण्यात आल्यामुळे कोणाची गैरसोय झाली नाही. करोनाला लढा देण्यासाठी वाई नगरपालिकेच्या वतीने वाईकर नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. लॉकडाऊनचे पालन लोक करत आहेत. वाई पालिकेने एक पाऊल पुढे उचलत वाई शहरात कर्फ्यूची घोषणा केली.
गुरुवारपासून (दि. 2) ते शनिवारी (दि. 4) रात्री बारा या कालावधीत कडक लॉकडाऊन असून जीवनाश्यक वस्तू, किराणा माल दुकाने, मेडिकल दुकाने मात्र सुरू ठेवण्यात आली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने नेमलेल्या दुकानदाराला संपर्क साधून वस्तू घरपोच देण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना कोणत्याही गैरसोयीस सामोरे जावे लागले नाही. त्याकरिता नगरपरिषदेने व नगरसेवकांनी महत्वपूर्ण नियोजन केले होते.
त्याला वाईकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी 14 एप्रिलपर्यंत आपल्या घरीच थांबून अंतिम टप्प्यात आलेल्या लढाईचा सामना धैर्याने करूया आणि आपला देश करोनामुक्त करूया, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, आरोग्य सभापती रुपाली वनारसे, कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी, अधिकारी व सर्व नगरसेवकांनी केले आहे.