नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील कलगितुरा वारंवार माध्यमांमध्ये चर्चिला जातो, मात्र आमच्यात असे कोणतेही वाद नाहीत. गांगुलीबद्दल मला आदरच आहे, असे शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
गांगुलीबद्दल मला खूप आदर आहे. आमच्यात काहीतरी बिनसलेले आहे, असे जे म्हणतात ते अत्यंत चूक आहे.
गांगुली व शास्त्री जोडीबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उलट सुलट विधाने प्रसिद्ध होत आहेत, मात्र आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, आम्ही कायम एकमेकांच्या संपर्कात असतो व अत्यंत चांगल्या पद्धतीने आमची चर्चा होते, असेही शास्त्री यांनी स्पष्ट केले.
मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर अत्यंत नाजुक काळात भारतीय क्रिकेटचे नेतृत्व गांगुलीने अत्यंत समर्थपणे सांभाळले. त्यावेळी गांगुलीतील एक कणखर व्यक्ती मी पाहिला आहे, त्यामुळेच त्याच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला, असेही शास्त्री यांनी सांगितले.