आपण फुलाकडे बघतो तेव्हा आपल्याला त्याच्याविषयी आकर्षण वाटतं. परंतु त्याचा गंध श्वासात भरताना त्याच फुलाविषयी आपल्याला आदर वाटतो. त्या फुलाच्या काळजाच्या कुपीतले पराग बघतो तेव्हा तर आपल्या मनात मार्दवाची सतार झंकारते. त्या परागांना धक्का लागू नये म्हणून, फूल तोडण्यासाठी फुलाच्या जवळ नेलेला हात आपण मागे घेतो. प्रचंड आवडलेलं असतानाही ते फूल न तोडण्याची जी भावना आपल्या मनात निर्माण होते ती केवळ आदरापोटी. जेव्हा मनात आदर निर्माण होतो तेव्हा डोळ्यांवरची आकर्षणाची झापडं आपोआप दूर होतात.
हे जसं फुलाविषयी म्हणता येईल तसंच स्त्री विषयीदेखील म्हणता येईल. एखादी स्त्री सुंदर दिसते म्हणून तिच्याविषयी आकर्षण निर्माण होईल. मात्र, जेव्हा तिचे अंतरंग लक्षात येतील तेव्हा त्या अंतरंगांना एक वैचारिक बैठक आहे हे लक्षात येईल. तेव्हा त्या स्त्रीविषयी आपल्याला आदर वाटायला लागेल. जेव्हा आकर्षणाची, स्वार्थाची, मोहाची जागा आदराने व्यापली जाते तेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची पूजा मांडू पाहते. बऱ्याचदा ही दुसरी व्यक्ती स्त्री असते. ज्या स्त्रीविषयी पुरुषाला आदर वाटतो तिची पूजा मांडताना पुरुषाला कधीही कमीपणा वाटत नाही.
स्त्रीविषयी आकर्षण वाटणं नैसर्गिक आहे. परंतु एखाद्या स्त्रीविषयी आदर वाटत असेल, तर तिच्याविषयी आकर्षण निर्माण होईलच असं नाही. आणि एखाद्या स्त्रीविषयी आकर्षण निर्माण झालं म्हणून तिच्याविषयी आदर वाटेलच असंही नाही. आकर्षण हे बाह्यरूपावर अवलंबून असतं, तर आदर हा अंतर्गत अनुभूतींवर आधारलेला असतो. स्त्रीचं बाह्यरूप या “फुलाच्या पाकळ्या’ आहेत असं गृहीत धरलं तर माया आणि ममता हे तिचे अंतरंग आहेत. आणि त्यामुळेच स्त्रीच्या बाह्यरूपाला भुलून तिच्याकडे ओढल्या गेलेल्या पुरुषाला तिच्या अंतःकरणातील मायेची, ममतेची अनुभूती येते तेव्हा तिच्याविषयी पुरुषाला आदरच वाटू लागतो. अर्थात स्त्रीमधली माया, ममता यांची अनुभूती घ्यायला पुरुषाच्या अंतःचक्षूचे दरवाजे उघडे असावे लागतात. ते उघडे नसतील तर मात्र त्याला स्त्रीमधली फक्त मादीच दिसते. आदर आणि आकर्षण या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात, त्यावेळची अनुभूती अत्यंत उच्चप्रतीची असते. त्या अनुभूतीला अद्वैत होणं म्हणत असावेत.
मी माझ्या पत्नीकडे बघतो तेव्हा तिच्यातल्या बायकोपेक्षा, तिच्यातली “माझ्या मुलांची आई’ हीच तिची प्रतिमा मला फार मोठी वाटते. मी तिच्यातल्या त्याच प्रतिमेला नेहमी वंदन करत असतो. “घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी.’ हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु मी आजवर आकाशात उडणारी घार पाहिली आहे. तिचं घरटं नेमकं कुठं असतं हे मला तरी माहीत नाही. तिचं घरटं कुठेतरी झाडाझुडपावरच असेल. पण चिमणीचं, सुगरणीचं घरटं जसं मी पाहिलेलं असतं तसं, घारीचं घरटं मी तरी पाहिलेलं नाही. घार आभाळात घिरट्या घालताना दिसते. पण घरट्यात तिच्या पिलांना कुशीत घेऊन बसलेली घार मी अद्याप तरी पाहिलेली नाही.
जिथे मी घारीचं घरटंच पाहिलेलं नाही तिथं तिची पिलं कुठून दिसणार? परंतु गावाकडे आपल्या पिलांना सांभाळणारी कोंबडी मी अनेकदा पाहिली आहे. ती आणि तिची पिलं अंगणात खाद्य टिपत असतात. कुठून कशी कुणास ठाऊक, पण चाहूल लागते. कोंबडीची पिलं लगबगीने तिच्या भोवताली जमा होतात. कोंबडीदेखील आकाशाचा वेध घेते. रागाने फुलून येते. आणि वेगाने खाली येऊन तिच्या पिलांवर झडप घालू पाहणाऱ्या घारीवर झडप घालते. तिला माहीत असतं की, आपण घारीइतकी उंच झेप घेऊ शकत नाही. पण तरीही ती पंख फडकावत घारीवर झेप घेते. मी अशा कोंबडीकडे बघतो तेव्हा मला तिच्याविषयी आदर वाटतो. घारीवर धावून जाणारा कोंबडा मी कधी बघितला नाही. पण संकटकाळी पिलांना वाऱ्यावर सोडून आडोशाला गेलेली कोंबडी कुठेच दिसत नाही.
आदर आणि आकर्षण ही भावना केवळ स्त्री बाबतीतच असते असं नाही. पंधरा एकदिवसापूर्वी मी दिवेआगर इथे गेलो होतो. वाटेने चालताना फुफाट्यात पाय भाजलेल्या माणसाने सावली दिसताच सावलीच्या दिशेने धाव घ्यावी आणि आपल्या पोळलेल्या पावलांना गार होण्यासाठी सावलीत बुडवून टाकावं तसा दिवसभर तापलेला सूर्य थंड होण्यासाठी सूर्य समुद्राच्या दिशेने धाव घेत होता. सुमद्रात डुबकी मारण्याची त्याला फार घाई झाली असावं असं वाटत होतं. मी समुद्राच्या वाळूत उभा राहिलो. माझ्या पावलांपासून समुद्र कासरा दीड कासरा आत असावा. ओहोटी संपून भरती सुरू झाल्याचं जाणवत होतं. जणू काही मी त्याच्या भेटीसाठी आलो आहे हे लक्षात आल्यामुळे समुद्र माझ्या दिशेने धाव घेत होता. एका पेराचे डोळे माझे. पण मी समुद्र डोळ्यांत साठविण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचा वारा श्वासात भरून घेत होतो, त्याची गाज कानात साठवत होतो. त्याच्या लाटांचा नाच माझ्या मनात अनुभवत होतो.
समुद्र असला तरी त्याला मनात येईल त्या वेगाने किनाऱ्याकडे सरकण्याची मुभा नव्हती. तो बाहेर यायचा पुन्हा आत जायचा. पुन्हा बाहेर येताना कासवाच्या गतीने वीतभर माझ्या दिशेने सरकायचा. असे करता करता समुद्र बराच पुढे आला. सूर्याने तर केव्हाच समुद्रात डुबकी मारली होती. त्यामुळे समुद्राच्या पाण्याला केशरी रंगछटा लाभल्या होत्या. माझ्या पायांना समुद्राची मऊसूत रेती कुरवाळत होती. समुद्र माझ्या पावलांपासून अगदीच हातभार अंतरावर आलेला होता. समुद्राची केशरी छटा मावळली होती. समुद्रावर काळोखाच्या छटा पसरू बघत होत्या. मुक्कामी परतण्याची घाई झालेले मित्र मला हाका मारत होते, मनात आलं- आता समुद्राने आपल्या पावलांना स्पर्श केला की लगेच निघू या.
माझ्या मनातले विचार समुद्राने नक्कीच ओळखले असावेत. पण समुद्राला माझ्या विचारांचा राग आला नाही. तो कासवाच्या गतीने माझ्या पावलांच्या दिशेने सरकत राहिला. माझ्या पावलांपासून वीतभर अंतरावर आला. आणि माझ्या मनात आलं- समुद्राने का म्हणून माझ्या पावलांना स्पर्श करावा. कोण मी? समुद्राच्या अणुरेणुएवढी तरी माझी किंमत आहे का? समुद्राविषयी माझ्या मनात समुद्राएवढा आदर दाटून आला. समुद्र माझ्या पावलांच्या दिशेने सरकत होता. मी माझी पावलं मागे घेतली. नतमस्तक झालो. मनोमन समुद्राची माफी मागितली. आदर माणसाला नतमस्तक व्हायलाच लावतो, याची मला प्रचिती आली.
– विजय शेंडगे